ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बायपास रस्त्याचा दुसरा टप्पा मंजूर

40

🔹भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.17मार्च):- शहरालगतच्या बायपास रस्त्याचा दुसरा टप्पा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसायमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मंजूर झाला आहे.त्याअनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.यापूर्वी पहिला टप्पा मंजूर झाला होता परंतु तो टप्पा फक्त म्हातारदेवी रस्त्यापर्यंत होता. घुग्घुस शहराची वाढती वाहतुक समस्या लक्षात घेत दुसरा टप्पा मंजूर व्हावा यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती.

शहरातील वाहतुकीची समस्या तातडीने निकाली काढून रखडलेल्या कामांना गती द्या, अशा सूचना पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. शहरात निर्माण झालेली वाहतुकीची समस्या आणि मागील मविआ सरकारच्या उदासीन धोरणामुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मागील वर्षी १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बैठक घेतली होती. शहरालगतच्या बायपास रस्त्याची उर्वरित प्रक्रिया पुर्ण करून रस्ता सुरु करणे व दुसऱ्या टप्प्याची पाहणी करणे, शहरात वारंवार निर्माण होणारी वाहतुक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा पार पडली होती. घुग्घुस येथे भेट देऊन बायपास रस्त्याची पाहणी करून प्रत्यक्ष कामाचे नियोजन तयार करावे. असे निर्देश बैठकीदरम्यान पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना दिले होते.

त्याअनुषंगाने मागील वर्षी १७ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, तहसीलदार निलेश गौड, सा. बां. वि. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, प्रकाश अमरशेट्टीवार, तत्कालीन ठाणेदार बबन पुसाटे, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी संयुक्तरित्या प्रत्यक्ष बायपास रस्त्याची पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना देण्यात आला होता सोबतच शासनाला सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्यानुसार नुकताच शासनाने अर्थसंकल्पात सदर रस्त्याच्या जमीन अधिग्रहनासाठी ३ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. शासनाने ३ कोटी रुपयांची मंजुरी दिल्याने बायपास रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घुग्घुस शहर वासियांची वाहतुकीची समस्या निकाली निघणार असल्याने घुग्घुस शहर वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.