प्रयोगशील व्यक्तिमत्त्व डॉ. सुनील दादा पाटील

34

प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असली की, व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करतो. आकाशालाही गवसणी घालू शकतो. कष्ट हेच माणसांच्या स्वप्नांचे पंख आहेत. कितीही प्रतिकूल वादळे आली तरी त्यांच्यावर मात करतो. ‘एरवी झाडे बेईमान झाली आहेत, अशी मुळांची तक्रार असली’ तरीही काही झाडे मात्र शेवटपर्यंत मातीशी घट्ट नाते सांगतात. आपल्या मुळा-तळाला विसरत नाहीत. अगदी असेच साहसी, विनयी आणि प्रयोगशील व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सुनील दादा पाटील.

जरी माणूस आधी विचार करू लागला आणि पुस्तके खूप नंतर तयार झाली, तरी माणूसपणाच्या प्रवासाला दिशा आणि गती देण्याचे काम पुस्तकेच करीत आली आहेत. देकार्तने असे म्हटले की, “आय थिंक, देअरफॉर आय एम.” माणूस म्हणून आपले अस्तित्व आपल्या विचार करण्यात असते. माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो, असे पवित्र बायबलमधील एक वचन आहे. आज आपल्या विचारांचा मूलाधार वाचन असल्याने आपले प्राक्तन घडविण्यात पुस्तकांची भूमिका मोठी आहे. जे इतिहास विसरतात त्या दुर्दैवी जीवांच्या वाट्याला त्याची पुनरावृत्ती येते.

यशाची हवा डोक्यात जाऊ न देता ते जमिनीवर आहेत. ज्या प्रतिकूल परिस्थितीतून आपण आलो त्याची जाण ठेवत त्यांचे विविधांगी प्रयोगशील कार्य सातत्याने सुरू आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर पट्ट्यात डॉ. सुनील दादा पाटील वेगाने त्यांचे काम करीत आहेत. त्यांचे वास्तव्य सद्या जयसिंगपूर, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर या ठिकाणी आहे. त्यांचे मूळ गाव बुलढाणा जिल्ह्यातील जामगाव, तालुका – मेहेकर हे आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले. शालेय शिक्षण मेहेकरला तर हैद्राबाद येथून त्यांनी इतिहास विषयात आचार्य ही पदवी मिळविली.

खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर पाचगणी व महाबळेश्वर येथे ते बरेच काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते तर जयसिंगपूर येथे प्राचार्य म्हणून त्यांनी सेवा बजावली. नोकरीनिमित्त त्यांची बरीच भटकंती झाली आणि आयुष्य समृद्ध झाले. आता जयसिंगपूर येथे ते संपादन, मुद्रण, प्रकाशन आणि ग्रंथ वितरण या व्यवसायात सेटल झाले आहेत. त्यांच्या पुस्तकांना खूपच प्रतिसाद मिळाला. हळूहळू उद्योग वाढत जाऊन तो एक नामांकित बनला. आपला उद्योग त्यांनी अत्यंत काटेकोरपणे वाढवला आणि अतिशय साधेपणाने ते आपल्या आयुष्यात वावरत आहेत. डॉ. सुनील दादा पाटील यांनी शून्यातून उभा केलेला हा त्यांचा व्यवसाय प्रचंड मोठा बनला नसता तरच नवल! स्वत:साठीत्यांनी अनेक कठोर आणि शिस्तबद्ध नियम घालून घेतले आहेत. त्यांच्या यशाचे गमक कष्टात आणि दूरदृष्टीमध्ये आहे. त्यांच्या मूळगावी जामगाव, तालुका – मेहेकरला ते कधीतरी सणावाराला आणि उन्हाळ्यातील सुट्टीत येत असतात.

डॉ. सुनील दादा पाटील यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. मेहेकर शहरातील डॉ. डी. एम. चांगाडे आणि डॉ. नंदकुमार नहार यांच्या दवाखान्यात शालेय जीवनात त्यांनी कंपाउंडरचे काम केल्याची आठवण ते आवर्जून सांगतात. वेळ प्रसंगी सार्वजनिक वनीकरण खात्याच्या वृक्षारोपण योजनेत रस्त्याच्याकडेला भर उन्हात पाच – दहा किलोमीटर पायी चालत जाऊन खड्डे खोदल्याचे आणि इतरांच्या शेतीवर मोल-मजूरी केल्याचीही त्यांना आठवण आहे. घरी थोडी-फार शेती असली तरी ती शाश्वतीची नव्हती म्हणून त्यांची पावले शिक्षणाकडे वळली. वाचनाने त्यांना आत्मभान दिले. अर्थात त्यासाठी त्यांना खूप कष्ट सोसावे लागले. शालेय जीवनातच त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यातूनच त्यांची प्रतिभा बहरली आणि त्यांना लिहिण्याचा छंद जडला. त्यांनी अनेक नवसाहित्यिकांना बळ दिले. भूमिका घेऊन लिहिणार्‍यांची संख्या कमी होत असताना त्यांच्या साहित्यातून नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळते. महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ग्रामीण जीवन, लोकसंस्कृतीचा प्रभाव त्यांच्या ऐकूणच साहित्यावर राहिला आहे. त्याशिवाय ‘कवितासागर साहित्य अकादमी’ च्या माध्यमातून त्यांनी गावगाड्यातील अनेक लेखकांना नेहमीच बळ देण्याचे काम केले आहे. अनेक पुरस्कार, मान-सन्मान मिळूनही मातीत पाय घट्ट रोवून उभे असलेले डॉ. सुनील दादा पाटील नव्या पिढीसाठी अनेक अंगांनी आदर्श आहेत. भोवतालातील विविध घटना-घडामोडीवर भाष्य करत समाजाला सतत जागे ठेवणारे प्रागतिक लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे साहित्यिक योगदान मोठे आहे.

चांगली पुस्तके आपल्या संग्रही असली पाहिजे या निर्धाराने पुढे त्यांनी नव्या पुस्तकासह कैक रद्दीची दुकाने धुंडाळली. त्यातूनही अनेक पुस्तके खरेदी केली. आज त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात ३० हजारांहून जास्त पुस्तके आहेत. विशेष म्हणजे त्यात सात हजार मराठी कवितासंग्रह आणि आठ हजारापेक्षा अधिक जगभरातील दिवाळी अंक आहेत. याचा त्यांना अभिमान आहे. त्यांच्या जयसिंगपूर येथील घरामध्ये पुस्तकेच पुस्तके भरलेली आहेत. घराला जणू भिंतीच नाही असेच वाटते. दिवाणखान्यापासून ते बेडरूम, किचनपर्यंत सर्वत्र पुस्तके रचून ठेवलेली आहेत. कवितासागर पब्लिशिंग हाउस या प्रकाशन संस्थेच्या पुस्तकासाठी तर स्वतंत्र गोडावूनच त्यांनी तयार केले आहे.

कोल्हापूर परिसरात छोट्या-छोट्या गावांमध्ये त्यांनी अनेक ग्रंथ प्रदर्शने आणि साहित्य संमेलने भरविली आहेत. तीन वर्षात ३६० पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर या मुद्रण आणि प्रकाशन संस्थेच्या नावावर आहे. यासह अनेक अफलातून प्रयोगामुळे आज वयाच्या अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षात असताना त्यांच्या नावाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह एक डझनाहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुकमध्ये त्यांच्या कार्याची नोंद आहे.

ग्रंथ व्यवसायातली खरी समस्या ही असते की – १० पुस्तके विकली जाण्यासाठी इतर १०० पुस्तके ठेवावी लागतात, आणि नेमकी कोणती १० विकली जाणार हे बहुतेक वेळा ती विकली गेल्यावरच समजते. या इतक्या वर्षात लाखो पुस्तकांची निर्मिती झालेली आहे. तुम्ही फार तर १०,१५,२५,४० हजार पुस्तके ठेवू शकता. सुमारे ८०-९० % वेळा ग्राहकाने मागितलेले पुस्तक तुम्ही देऊ शकलात तर तुम्ही चाणाक्ष आणि यशस्वी विक्रेते! यशस्वी होणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, म्हणून चाणाक्ष होऊया! असे आपल्या ग्रंथ वितरण अनुभवाबद्दल डॉ. सुनील दादा पाटील म्हणतात.साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि संशोधनासाठी ‘कवितासागर साहित्य अकादमी’ ची त्यांनी स्थापना केली आहे. काही काळ त्यांनी ‘काव्यबहार’ हे त्रैमासिक आणि ‘कवितासागर’ नावाचे मासिकदेखील चालविले. कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर यांच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत आणि हिब्रू अशा विविध भाषांमधून आजवर आठशेहून अधिक पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. आत्मचरित्रे, संत साहित्य, जनरल नॉलेज, शेती, पर्यावरण, वैचारिक ग्रंथ यासह कथा व कवितांची अनेक दर्जेदार पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे या प्रकाशन क्षेत्रातील शिखर संस्थेने त्यांच्या कवितासागर प्रकाशन संस्थेस २०२०, २०२१ आणि २०२२ या सलग तीनही वर्षी ‘बेस्ट पब्लिकेशन कॅटलॉग’चा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला तसेच त्यांच्या विविध पुस्तकांना अनेक उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. सुनील दादा पाटील हे एक उपक्रमशील प्रकाशक आहेत. अनेक चांगल्या लेखक – कवींना घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. पुस्तकप्रेम व वाचनवेड हा त्यांचा श्वास आहे.वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी त्यांनी सांगली आणि कोल्हापूर येथील कारागृहात केलेल्या प्रबोधनामुळे कैदीदेखील वाचनाकडे वळले. अनेक कैदी लिहू लागले. कैद्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारीदेखील डॉ. सुनील दादा पाटील यांनी घेतली. त्यातून काही कैद्यांची पुस्तके देखील त्यांनी स्वखर्चाने प्रकाशित केली. विशेष म्हणजे कैद्यांचे वाचनविश्व वाढावे यासाठी त्यांनी आजवर जवळपास तीन हजार पुस्तके कारागृहातील ग्रंथालयाला भेट स्वरुपात दिली आहेत. बरेचसे कैदी त्यांची शिक्षा समाप्त झाल्यानंतर घरी जाण्याआधी त्यांना भेटायला येतात. ‘तुम्ही दिलेल्या पुस्तकांच्या वाचनाने माझे आयुष्य बदलले’ असे आवर्जून सांगतात. दोन वर्षापूर्वी सांगली कारागृहातील एका कैद्याच्या कथा तर त्यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक दिवाळी अंकात छापून आणल्या होत्या. असे मुलखावेगळे विविध प्रयोग डॉ. सुनील दादा पाटील यांनी आजवर केलेले आहेत.

लहानपणी घरच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे त्यांचे बालपण फारसे सुखकर गेले नाही. दुसर्‍यांची पुस्तके घरी आणून रात्रभर दिव्याखाली वाचत बसत. त्यांच्या शर्टला चार – चार ठिगळे असायची मात्र हातात पैसे आले की, पहिल्यांदा पुस्तके विकत घेऊन वाचत असत. पुढे – पुढे वाचलेले पुस्तक पुन्हा अनेकांना वाचायला देणे हा त्यांचा छंदच झाला. ते लोकांना केवळ वाचण्यासाठी प्रेरित करीत नसून नेमके काय वाचावे याचे सुद्धा उत्तम मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्या छंदात स्वत:ला झोकून दिले मात्र आपल्या आयुष्याकडे आणि परिवाराकडे मात्र त्यांनी अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही.

मुलांसाठी त्यांनी बाल वाचनालय सुरू केले आहे. याशिवाय वर्ष २००९ पासून त्यांनी वाचन संस्कृती वाढावी यासाठी अभिनव ‘मोफत पोस्टल लायब्ररी’ हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी अनेक दात्यांकडून जुनी-नवी पुस्तके मिळविली आहेत. त्यात स्वत:च्या काही पुस्तकाची भर घालून ही पुस्तके मागेल त्याला टपाल खर्चाची झळ सोसून ते मोफत पाठवतात. या पुस्तकासोबत पुरेसे तिकीट लावलेले परतीचे पाकिटही पाठवतात. वाचकाने पुस्तक वाचून झाल्यावर पाकिटात टाकून ते फक्त पोस्टाच्या पेटीत टाकण्याची तसदी घ्यायची. या पद्धतीने प्रथम फेरीत एकदा वाचकाने पुस्तक वाचून परत केले की, त्या वाचकाचे संगणकावर लायब्ररी कार्ड तयार होते. पोस्टल लायब्ररीचे अशाप्रकारे मोफत सदस्य होता येते. वाचकांना पोस्टाने पुस्तके येत राहतात. संपूर्ण राज्यभरात त्यांचे पसरलेले नेटवर्क, अनेक व्याख्यानमाला, सामाजिक संस्था या माध्यमातून शाळा – कॉलेजमध्ये आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके कसे पोहचतील यासाठी पुढाकार घेणारे डॉ. सुनील दादा पाटील यांचं सगळंच काम थक्क करणारे आहे.

एका शिक्षकाने / लेखकाने ठरवलं तर तो काय करू शकतो, याचे डॉ. सुनील दादा पाटील हे एक उत्तम उदाहरण आहेत, त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील आणि चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील त्यांना भक्कमपणे साथ देत आहेत. घर, मुलांचे शिक्षण, आपला व्यवसाय एवढं सगळं करूनसुद्धा डॉ. सुनील दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा देऊन या वाचन चळवळीमध्ये त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी यांनी स्वत:ला झोकून दिलंय. दरवर्षी साधारणपणे दहा हजारांपेक्षा अधिक पुस्तके वाटून त्या वाटलेल्या पुस्तकांच्या माध्यमातून सातत्याने काही तरी चांगुलपणाची पेरणी करण्यासंदर्भात डॉ. सुनील दादा पाटील आणि सौ. संजीवनी सुनील पाटील यांनी घेतलेला पुढाकार हा खरोखरच एक आदर्शवत आणि अभिमानास्पद आहे. सर्वांनी त्यांच्यापासून आदर्श आणि प्रेरणा घ्यावी. असेच त्यांचे कार्य असून कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

वाचन संस्कृती आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मागे पडत चाललीय त्याला पाटील दांपत्य नवसंजीवनी देत आहेत! या सगळ्यांनी स्वतःला वाचन चळवळीसाठी वाहून घेतलयं.आताच्या पिढीला वाचन आवडतच नाही. मोबाईलमध्ये सर्व मिळते म्हणून छापील पुस्तके हातातून सुटत चालली! पण जुनं ते सोनं हेच खरं! छापील पुस्तक वाचण्यात जी मज्जा आहे ती अन्य कशातच नाही. ज्या जागेत माणसे पुस्तकांसह राहतात त्याला ‘घर’ म्हणावे. जिथे माणसे किंवा जनावरे पुस्तकांशिवाय राहतात त्याला ‘गोठा’ म्हटले पाहिजे. आपण कुठे राहतो हे ज्याचे त्याने तपासून पहावयास हवे. अर्थात केवळ पुस्तके ठेवल्याने ‘घर’पण येत नसते. ती वाचली नाहीत तर घरचा गोठा व्हायला मुळीच वेळ लागणार नाही. एखादी संस्कृती नष्ट करण्यासाठी पुस्तके जाळण्याची आवश्यकता नसते, त्यासाठी माणसांनी पुस्तके वाचन कमी करणे पुरेसे असते. पुस्तकांवर धूळ बसू देणे किंवा त्याला वाळवी लागू देणे यात पुस्तके जिवंतपणीचे मरण अनुभवत असतात. दिवाणखान्यात कपाटात दिमाखात रचलेली, मात्र कधीच हाताळली न जाणारी पुस्तके अधिक दुर्दैवी असतात की त्यांचे मालक? विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके व पोहचविणे हे शाळा – महाविद्यालयांचे आणि तेथील शिक्षक – प्राध्यापकांचे सर्वात मोठे अपयश असावे.

एखाद्या वाचकाला एखादे पुस्तक खूप आवडले आणि ते त्यास ठेवून घ्यायचे असेल तर तसेही करता येते. अशावेळी मात्र त्या पुस्तकाच्या किंमती एवढे स्वत:कडील कोणतेही एक पुस्तक वाचकाने पाकिटात टाकून परत पाठवायचे ही अट आहे. मात्र पुस्तक परत न पाठवता गहाळ केले की, पुस्तक पुरवठा थांबतो, सदस्यता आपोआपच रद्द होते. त्यांच्या या अभिनव उपक्रमाविषयी विचारले असता डॉ. सुनील दादा पाटील म्हणाले की, “लोकांची वाचनाची अभिरुची कमी होत चालली आहे. लिहिणार्‍यांच्या घरातही वाचणारे नाहीत. ग्रंथागारे ओस पडली आहेत. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती ग्रंथालयात जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही साडे बाराशे लोकांना पोस्टाद्वारे नियमित मोफत ग्रंथ पुरवठा करीत आहोत. चांगल्या आचारासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते आणि चांगल्या विचारांसाठी चांगल्या वाचनाची आवश्यकता असते. यासाठी बालक असो की, पालक दोघांनाही वाचनाची आवड असावी. आज टी. व्ही., कॉम्प्युटर, आणि मोबाईल मुळे लोकांचे वाचन कमी झाले आहे. कोणाच्याही दिवाणखान्यात गेल्यावर समोर टी. व्ही. आणि टिपॉयवर रिमोट दिसतो. मात्र त्याच ठिकाणी जर पुस्तके असतील तर अल्प-स्वल्प कामासाठी आलेली व्यक्तीही सहज पुस्तके चाळतील, वाचतील. पुस्तकाच्या प्रेमात पडतील. घरामध्ये टी. व्ही. चा रिमोट जितका सहज दिसतो, तितकी सहजपणे पुस्तके दिसली पाहिजेत तरच लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल. बदलत्या जगाची गती पकडण्यासाठी माणसाची मनं दगड झाली आहेत. रोबोटप्रमाणे वागणार्‍या घरातील माणसांनी मुलांची मनं संकुचित केली. त्यामुळे संस्कार व संस्कृती जपणारी पुस्तकं अनाथ झाल्याने मुलांचे मोबाईल वेड वाढले आहे. काळासोबत नव्या तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. यासाठी कुटुंब व शिक्षकांनी मुलांना मोबाईल साक्षर करावे. मुलांना ज्ञानेंद्रियाचा वापर सकारात्मक करण्यासाठी प्रशिक्षित करावे. मुलांच्या मनाला योग्य वळण देण्याची जबाबदारी न स्वीकारल्यास समाज विकृत बनेल याची भीती वाटते.” असेही ते आवर्जून सांगतात.
डॉ. सुनील दादा पाटील यांचे काम नक्कीच ‘आश्वासक’ या सदरात मोडणारे आहे. लोकांना पुस्तकाशी जोडणारे आहे. पुस्तके मस्तक सशक्त करतात. मस्तक सशक्त असले की, ते कधीही कुणाचे हस्तक होत नाही. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून घडत असतं. पुस्तके चांगले विचार देतात, चांगले विचार तुम्हाला बदलू शकतात. ज्ञान ही परमभूक, भूकेची भूक आहे. पाहणं, वाचणं, चिंतन, मनन हा ज्ञानाचाच प्रकार आहे. डॉ. सुनील दादा पाटील यांचे या प्रयोगशील कार्याबद्दल मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन…! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! (वाचकांसाठी डॉ. सुनील दादा पाटील – जयसिंगपूर यांचा संपर्क क्रमांक ९९७५८७३५६९, ८४८४९८६०६४)

✒️रविंद्र साळवे(बुलढाणा)मो:-9822262003