पत्रकारांनंतर त्यांच्या पत्नींना मिळावे निवृत्तीवेतन-व्हॉईस ऑफ मीडियाची मोठी भूमिका

34

🔸मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रेटली मागणी

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.4जून):-महाराष्ट्रातील पत्रकारांना मिळणारे सध्याचे निवृत्तीवेतन त्यांच्या निधनानंतर पत्नीला मिळावे, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे.

महाराष्ट्रातील पत्रकारांची अवस्था आणि परिस्थितीपासून शासन अवगत आहोत. पत्रकरांना सद्य:स्थितीत केवळ ११ हजार रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन देण्यात येते. हे निवृत्ती वेतन देताना अनेक अटी जाचक पद्धतीने सरकारी बाबुंकडून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे हक्काचे निवृत्ती वेतन मिळविताना पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची चांगलीच परवड होत असल्याकडे काळे व म्हस्के यांनी लक्ष वेधले आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिनु रणदिवे यांना त्यांचे निधन झाले त्या दिवशी शासनाने त्यांचे निवृत्ती वेतन मंजूर केले. विशेष म्हणजे निवृत्तीवेतन मंजूर झाल्यानंतर रणदिवे यांचे निधन झाल्याचे कळल्यानंतर ही सुविधा लागलीच बंदही करण्यात आली. त्यामुळे रणदिवे यांच्या पत्नीची प्रचंड परवड उतारवयात झाली. मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. परंतु सरकारी नियम आड येत असल्यामुळे व कात्रणं नसल्यामुळे त्यांनाही निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कामाचा दांडगा अनुभव असलेल्या योगेश त्रिवेदी यांनाही निवृत्ती वेतनासाठी सरकारी कार्यालयायाकडुन अशाच चकरा मारायला लावण्यात येत असल्याबद्दल काळे आणि म्हस्के यांनी प्रचंड नाराजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

पत्रकारांना मिळणारी हे निवृत्तीवेतन आजच्या महागाईच्या युगात आधीच कमी आहे. अशात पत्रकाराचे निधन झाल्यानंतर हे निवृत्तीवेतन त्याच्या पश्चात हयात असलेल्या पत्नीला देण्यात येत नाही. हे निवृत्तीवेतन थेट बंद करण्यात येते. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारे निवृत्तीवेतन त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला देण्यात येते. पत्रकाराचे निधन झाल्यानंतर बंद होणाऱ्या पेन्शनमुळे उतारवयात अनेक पत्रकारांच्या विधवा पत्नींची परवड होत आहे. याची उदाहरणे दाखवून देता येतील. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांच्या निधनानंतरही त्यांचे निवृत्तीवेतन त्यांच्या पत्नींना हयात असेपर्यंत देण्याबाबत शासनाने मानवीय दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे. यासंदर्भात राज्य शासनाने निवृत्तीवेतनाच्या जाचक अटींमध्ये शिथिलता आणत पत्रकरांना त्यांच्या हक्काचे निवृत्तीवेतन सहजासहजी मिळेल अशी व्यवस्था करावी व निवृत्तीवेतनधारक पत्रकाराचे निधन झाल्यानंतर ही रक्कम त्यांच्या विधवा पत्नींना मिळावी, अशी तरतूद करावी अशी मागणीही संदीप काळे व अनिल म्हस्के यांनी केली आहे.
————————-

*पत्रकारांच्या कुटुंबांना आधार गरजेचा*

महाराष्ट्रातील बहुतांश पत्रकारांचे वेतन कमी आहे. अशात त्यांना निवृत्तीवेतन देताना अनेक सरकारी अटी लादण्यात येतात. पत्रकाराचे निधन झाल्यावर पेन्शन बंद करण्यात येते. अशात पत्रकारांच्या पत्नींनी काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. व्हॉईस ऑफ मीडिया हा मुद्दा लाऊन धरणार आहे. पत्रकारांची पेन्शन त्यांच्या निधनापश्चात त्यांच्या पत्नींना मिळावी अशी आमची मागणी आहे.

*- संदीप काळे*
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया
—————————

*जुलुमी अटी नको*

पत्रकारांना पेन्शन देताना असलेल्या अनेक अटी जुलुमी अशाच आहेत. अनेक पत्रकारांचे निधन झाले परंतु त्यांना अद्यापही पेन्शन मिळालेली नाही. व्हॉईस ऑफ मीडियाची भूमिका आहे की अशा सर्व पेन्शन निधन झालेल्या पत्रकारांच्या पत्नींना देण्यात याव्या. त्यामुळे त्यांचा उरदनिर्वाह व्यवस्थित चालेल.

*- अनिल म्हस्के*
प्रदेशाध्यक्ष
व्हॉईस ऑफ मीडिया