🔹मृग नक्षत्रही संपूर्ण कोरडे ; मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.21जून):- तालुक्यात अद्यापपर्यत मान्सूनने हजेरी लावलेली नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अर्धा जुन महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्याने मोर्शी तालुक्यातील सर्वच क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. ‘ये रे घना, ये रे घना’ अशी आर्त सार शेतकरी घालताना दिसत आहे. मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे संत्रा पिक संकटात सापडले असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. मोर्शी तालुक्यात कापूस, तूर, मिरची, मका, ज्वारी, आदी पीकाच्या पेरण्या खोळंबल्या असून हजारो हेक्टर वरील संत्रा उत्पादन संकटात सापडले आहे. पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर आलेला संत्रचा आंबिया बहार व मृग बहार धोक्यात आला असून पावसा अभावी लाखो संत्रा झाडे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रोहीणी नक्षत्र लागले की सर्वाना पावसाचे वेध लागतात, परंतु रोहीणी या नक्षत्रा पाठोपाठ मृग नक्षत्रात अजूनही पाऊस पडला नाही. गेल्या काही दिवसापासून वारा सुटला असुन पाऊस पडणार की नाही, अशी चिंता शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. रोहीण्याबरोबर मृग नक्षत्राचा पाऊसही नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोंळबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा कडक उन्हामुळे पावसाची सगळेच प्रतीक्षा करत आहेत, मात्र अजून पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्यामुळे परीसरातील नागरिक उकड्याणे त्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले असून प्रंचड उकडा जाणवत आहे. त्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध नागरीकाचे हाल होत आहेत. मानवासह पक्षु पक्षीही पावसाकरीता व्यकुळ झाले आहेत. सध्या ढगाळ वातावरणाचे सावट असल्याने उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
उधार उसनवारी करुन खाते बियाण्यांची सोय !
बळीराजासाठी महत्वपुर्ण असलेले मृग नक्षत्र कोरडे जात असल्याने खरीप हंगामासाठी तयार असलेला शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. कोणी हातातील पैसा खर्च करत तर कुणी घरातील सोन नाणं मोडुन, कुठे गहाण ठेवून, कुठे उधार उसनवार करून मोठ्या आशेने बियाणे व खताची तजवीज करून ठेवली आहे. कुणी बियाणे बुकिंग केले खर मात्र यंदा मृग नक्षत्रामधे आभाळातून पाऊसाचा एक थेंबही न पडल्याने सार्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. आज पडेल, उद्या पडेल या आशेवर आकाशाकडे आशाळभूतपणे नजर लावणार्या शेतकर्यांच्या पदरी मृगाने तरी निराशाच टाकली आहे. — रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य.
भीषण संकटाची भीती !
दरवर्षी अस्मानी संकटाशी सामना करणार्या बळीराजाची कथा आणि व्यथा समजायला आणि ऐकायला कोणी तयार नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी अनेकदा अनेक वर्षे खरीप हंगामात सापडलेल्या शेतकर्यांना यंदाही पावसाने पाठ फिरवुन संकटात टाकले आहे.