ध्वजसंहितेचे पालन करून घरोघरी तिरंगा फडकवावा

86

यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करीत आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला इंग्रजांच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेला आज ७६ वर्ष पूर्ण झाली आहेत. अर्थात हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला. हजारो, लाखो क्रांतिकरांकांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. या हजारो, लाखो ज्ञात- अज्ञात क्रांतिकारकांच्या, स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला व्हावी व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीनेही देशकार्यासाठी पुढे यावे या उद्देशाने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन केंद्र सरकारने केले आहे त्याचाच एक भाग म्हणून आजपासून म्हणजे १३ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत भारताच्या ध्वज संहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून भारताच्या नागरिकांना आपल्या घरी ध्वज फडकविण्याची परवानगी देण्यात आली. या दिवशी देशातील नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवावा असे आव्हान सरकारतर्फे करण्यात आले आहे. घरोघरी तिरंगा या उपक्रमाची जनजागृती व्हावी यासाठी देशभर विविध कार्यक्रम चालू आहेत. तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. देशाचे मानचिन्ह म्हणजे तिरंगा. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या सारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी तिरंगा अभिमानाने फडकावून तिरंग्याला मानवंदना देणे हे आपले कर्तव्यच आहे.

१३, १४ आणि १५ या तीन दिवशी सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवावा आणि तिरंग्याला मानवंदना द्यावी. घरोघरी तिरंगा फडकवताना ध्वज संहितेचे काटेकोरपणे पालन करावे. ध्वज फडकवताना ध्वजाचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. पूर्वी ध्वज तयार करण्यासाठी हाताने विणलेले किंवा कातलेले कापड वापरले जाई आता यंत्रावर तयार केलेले कापड देखील तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र हा कापडी तिरंगा ध्वज, चुरगळलेला, फाटलेला, किंवा खराब झालेला नसावा. ध्वज फडकवताना केशरी रंग वरच असावा कोणत्याही परिस्थितीत तो तळाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी.

तिरंगा ध्वज फडकवताना तिरंग्यापेकशा जास्त उंचीवर किंवा शेजारी दुसरा कोणताही ध्वज फडकवू नये. एकाच ध्वजारोहणाच्या खांबावरती तिरंग्या सोबत दुसरा कोणताही ध्वज फडकवू नये. तिरंगा उंचावरच फडकावा. तिरंगा फडकवल्यानंतर तो खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. ध्वज उतरवताना देखील ध्वज संहितेचा मान राखावा. सन्मानपूर्वक ध्वज उतरावा. कुठल्याही परिस्थितीत तिरंग्याचा अवमान होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी कारण तिरंगा हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे तिरंग्याला अपमान म्हणजे देशाचा अपमान. १५ ऑगस्ट नंतर तिरंगा ध्वज व्यवस्थित घडी घालून सन्मानपूर्वक ठेवावा. ध्वज संहितेच्या नियमांचे पालन करून प्रत्येकाने आपल्या घरावर डौलाने तिरंगा फडकवावा व घरोघरी तिरंगा हा उपक्रम यशस्वी करावा. जयहिंद ! जयभारत!!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)