मुख्यमंत्री साहेब संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणार का ?

110

🔹आजपर्यंतच्या अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी फक्त घोषणांचाच पाऊस !

🔸संत्रा उत्पादक शेतकरी “अच्छे दिन” च्या प्रतीक्षेत !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.24सप्टेंबर):-जिल्ह्यातील मोर्शी वरूड तालुका हा संत्रा विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून मोर्शी वरूड तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. आशीया खंडातील सर्वात जास्त पिकविला जाणाऱ्या मोर्शी वरूड तालुक्यातील नागपुरी संत्राने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोर्शी वरूड तालुक्यात ४७ हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. परंतु मोर्शी वरूड तालुक्यात कुठेच संत्रावर प्रक्रिया करणारा प्रकल्प नाही, कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस सुविधा नाही, तसेच संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची वाणवा असल्याने शसानाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.

मागील काही वर्षांपूर्वी वरूड तालुक्यात संत्रा परिषदेच्या उद्घाटनाला आलेले राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरूड येथे ऑरेंज डीहायड्रेशन प्रकल्प उभारणीची घोषणा केली होती. नंतर महाआघाडी सरकारनेदेखील वरूड- मोर्शीसाठी संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची घोषणा केली मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सन २०२१ मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोर्शी वरूड तालुक्यात अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प साकारणार असल्याची दमदार घोषणा केली. मात्र त्यावर दोन वर्षाचा कालावधी लोटून गेला तरीही घोषित झालेल्या अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाव आर्थिक तरतुद होऊ शकलेली नाही.

या पार्श्वभूमीवर शासनाने घोषित केलेल्या ऑरेंज डीहायड्रेशन प्रकल्प, अत्याधुनिक संत्रा प्रकल्प, हीवरखेड (ठाणा ठूनी) येथील जैन फार्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्पा करीता निधी उपलब्ध करून संत्रा प्रक्रिया पूर्णत्वास न्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे विदर्भ संत्राफळांच्या उत्पादनात माघारत आहे. उत्पादन चांगले असले तरी भाव मिळत नाही. शेती उद्योग प्रयोगशील असला पाहिजे. संत्री टेबल फ्रूट असून, चव चांगली आहे.

यामुळेच ती जगात पोहचविणे गरजेचे आहे. सिंगापूर, बांग्लादेश, दुबईसारख्या देशांत संत्री कंटेनरने पोहचविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. बांग्लादेशात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवून बाजारपेठेची माहिती घेतली जाणार आहे. त्यानुषंगाने वरूडमध्ये राज्यातील पहिला डीहायड्रेशन प्रकल्प उभारून संत्री डीहायड्रेट करून विकली जातील. मोर्शीमध्ये संत्रा रस प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याचे देशात विपणन करण्यासाठी ब्रँड निर्माण केला जाईल, असे ठोस आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना उद्घाटनप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. ते आश्वासन हवेतच विरले असून, त्यानंतरच्या सहा वर्षांच्या काळात याबाबत कुणी ‘ब्र’ हीकाढलेला नाही. कोकाकोला आणि जैन इरिगेशनचा संयुक्त प्रकल्प हिवरखेड (ठाणाठुणी) येथे साकारण्यात आला.

परंतु, सहा वर्षाच्या काळामध्ये जैन फार्म फ्रेश संत्रा उन्नती प्रकल्ल शासनाच्या उदासीन धोरणामुळे पूर्णत्वास जाऊन न शकल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादकांचा हिरमोड झाला असल्यामुळे विकासासाठी एकत्र आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन घोषणा केलेले अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प पूर्णत्वास नेतील का याकडे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया :–
विदर्भात एवढ्या वर्षांत आज पर्यंत एकही संत्रा प्रक्रिया प्रकल्प सरकारला उभारता आला नाही ही शोकांतिका आहे, विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फक्त तारीख पे तारीख देऊन सन १९५७, १९६३, १९९२, १९९५, २०१४, २०१७, २०१९, २०२१ च्या अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाच्या घोषणा करून विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केल्या गेली आहे. संत्रा प्रकल्पासाठी केल्या गेलेल्या या तारखा आणि घोषणा कधीच फळाला आल्या नाहीत. काही प्रकल्प सुरू होण्याच्या आधीच सुपडासाफ झाले. तर काही हवेतल्या हवेतच गायब झाले असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा घोषणांवर व शासनावर विश्वास राहिलेला नाही. :- रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य.