प्रखर आंबेडकरवादी पत्रकार मिलिंद फुलझेले पडद्याआड

267

दिनांक ७/ १०/२०२३ ला प्रखर आंबेडकरवादी पत्रकार मिलिंद फुलझेले यांच्या दुःखद निधनाने आंबेडकरवादी वैचारिक अग्रलेखात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकार मिलिंद फुलझेले यांनी आपली कारकीर्द आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून सुरू केली.वर्तमान आंबेडकरी व बहुजन चळवळीतून त्यांनी समाजाला ओळखले. त्यांची निष्ठा प्रखर व निर्भीड होती.

दैनिक जनवाद, दैनिक जनतेच्या महानायक व दैनिक बहुजन सौरभ या वर्तमानपत्रातील त्यांची संपादकीय व अग्रलेख वर्तमानाचा वेध घेणारे होते. ते म्हणायचे,” अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची चिड मला बुद्ध, फुले, आंबेडकरी विचारातून मिळालेली आहे. त्यामुळे मला शांत बसता येत नाही. ती चीड त्यांनी आपल्या लेखणीतून व वाणीतून सातत्याने प्रस्फोटीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.” जुन्या संदर्भातून नवीन अनुबंधही त्याने काढलेले आहेत. खऱ्या क्रांतीसाठी चक्र पूर्ण फिरू या..!,… आता कुठे मेला तुम्ही, आज कांशीरामजी असते तर.., लोकशाही वाचवणे ही नैतिक जबाबदारी.., ब्राह्मणोन्माद ….अशा विविध संपादकीय व अग्रलेखातून त्यांनी आपली आक्रमक शैली व विद्रोही शैली प्रस्फोटीत केलेली होती .

वर्तमानचा वेध घेऊन जबरदस्त शब्द प्रहार करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा शब्दाला महत्त्व देणारे मिलिंद फुलझेले हे आंबेडकरी पत्रकारातील अत्यंत निर्भीड असे पत्रकार होते .त्यांच्या अग्रलेखातून व संपादकीय लेखनातून आंबेडकरवादी कार्यकर्त्याला सतत ऊर्जा मिळत राहील. त्यांच्या अकाली निर्वाणामुळे जी पोकळी आंबेडकरी वैचारिक क्रांतीमध्ये निर्माण झाले ते भरून निघणार नाही. त्यांच्या परिवारास जगण्याचे बळ मिळो हीच मंगलकामना…!

त्यांना आमच्याकडून भावपूर्ण आस्वांजली…..

✒️प्रा.संदीप गायकवाड(नागपूर)