समाजसेवेतील दीपस्तंभ-समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड

100

समाजभूषण । सत्याचे शोधक ॥

कार्य सामाजिक ।श्रीकृष्णांचे ॥

सामाजिक ऋण फेडणे हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असते.मनुष्याची सामाजिक प्रतिष्ठा,मानसन्मान त्यांच्या कार्य कर्तृत्वावर केलेल्या उल्लेखनीय कामावर अधोरेखित होत असतो. यातीलच एक असामान्य, बहुआयाम,हुरहुन्नरी,व्यक्तिमत्त्व असलेले समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांचा आज ७६ वा वाढदिवस.आजच्या दिनाचे औचित्य साधून गेल्या ५० वर्षापासून समाजसेवा,संघटन आणि समाजप्रबोधन कार्याची दीक्षा घेऊन अहोरात्र समाजसेवकाची भूमिका विविध क्षेत्रात बजावणारे माळी समाजातील दीपस्तंभ,वऱ्हाड विकासचे संपादक,सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय मेळाव्याचे संयोजक प्रा.श्रीकष्ण बनसोड यांचे अभिष्टचिंतन.
” माझ्या अनुभवाचे सार ” ह्या पुस्तकामध्ये प्रा.बनसोड यांच्या बालपणापासून आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक साहित्य क्षेत्रात आलेले कडू-गोड अनुभव नवीन पिढी व समाजासाठी दिशादर्शक ठरावे या हेतुने प्रतिबिंबित केलेले आहे.

सदर पुस्तकाच्या भाग-२ मध्ये माळी समाजातील निवडक व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा अल्पपरिचय समाजदर्शन मधून प्रकाशित करण्यात आलेला आहे.सामाजिक संघटनासाठी प्रा.श्रीकृष्ण अनसोड अफाट कार्यक्षमतेचा तसेच विविध पैलूंचा,कार्यकर्तृत्वाचा परिचय त्यांच्या ” माझ्या अनुभवाचे सार ” या पुस्तकातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.वास्तविक पाहता त्यांचे आत्मचरित्र येथे शब्दबद्ध करणे अशक्य बाब आहे.यासाठी सदर पुस्तक वाचण्याची विनंती मी सर्व समाज बांधवांना करेल.

प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.आंबेडकर समाजभूषण पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तथापि,त्यांच्या जीवन कार्याचा संक्षिप्त आढावा मी लोकहितार्थ देत आहे. प्रा.बनसोड यांचा परिचय झाल्यानंतर त्यांच्या स्वभावाचे जवळून दर्शन घडले.त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू,त्याग वृत्ती,प्रचंड उत्साह, समाजाचे संघटन, करण्याची मनिषा आदी गुणांमुळे प्रभावित झालो. वऱ्हाड विकासच्या माध्यमातून गेल्या ३७ वर्षापासून माळी समाजाचे संघटन,प्रबोधन त्यांचे आजही सुरूच आहे. माळी समाजाचे मुख्यपृष्ठ म्हणून वऱ्हाड विकासला मान्यता मिळालेली आहे. यातूनच समाजाला गुणवंत विद्यार्थी तसेच उल्लेखनीय काम करणारे समाज बांधव,महिला यांच्या कार्याची माहिती समाजाला होत असते.

याशिवाय सर्व सभासदांचे वाढदिवस आजही त्यांच्या घरी जाऊन त्यांना फुले सावित्रीची प्रतिमा भेट देऊन साजरे करण्यामध्ये डॉ.बनसोड यांचा पुढाकार असतो.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे संस्थापक, प्रणेते व संयोजक म्हणून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांचा नावलौकिक व ख्याती महाराष्ट्रात आहे.आज पर्यंत त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन यशस्वी उत्पन्न झाले त्यातून त्यांनी अनेक साहित्यिकांना – कवींना घडविण्याचा प्रयत्न केला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत समाजाला अध्यक्षीय भाषणातून, उद्घाटकीय भाषणातून,स्वागताध्यक्षीय भाषणातून आणि परिसंवादातील विचारमंथनातून समाजप्रबोधन केले आहे.

परिचय मेळे । आंतर शाखीय ॥
आंतर धर्मीय I आयोजिले ॥

प्रा.बनसोड यांच्या अथक प्रयत्नाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऋणानुबंध परिचय पुस्तकाची सन्मानपूर्वक नोंद व दखल जागतिक युनिव्हर्सिटी कडून घेण्यात आली. ही बाब समस्त माळी समाजासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद आहे. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे विकासवार्ता हा विभागीय पुरस्कार,व्यसनमुक्ती विषयक निबंध मालेमध्ये प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.ते उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष असून अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे माजी कार्याध्यक्ष आहे,उन,वारा, पाऊस यांची किंचीत ही तमा न बाळगता २४ तास समाज कार्यासाठी प्रा. बनसोड तत्पर असतात.अशावेळी त्यांना प्रकृतीची, कुटुंबाची पर्वा नसते. शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवास अनेक वेळा मोटरसायकलवरून सुरू असते व आजही ते करीत आहेत. वि. मा. शिक्षक संघाचे जिल्हा सचिव असताना जेलभरो आंदोलनात त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना ७ दिवस कारावासात काढावे लागले.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,अखिल भारतीय माळी महासंघ यामध्ये त्यांनी अनेक पदावर उत्कृष्ठ कार्य केले आहे.

वंचित समाज । राहू नये कोणी ॥
झिजविली वाणी । जीवनात ॥

प्रा.बनसोड यांनी वंचित घटकांसाठी जे कार्य केले ते अनमोल आहे .त्यांची वाणी आणि लेखणी सतत त्यांनी वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झिजविली .ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, ओबीसींना शिष्यवृत्ती लागू व्हावी,स्पर्धा परीक्षेसाठी त्यांच्या जागा राखीव असाव्यात यासाठी प्रयत्न केलेले आहे.तसेच १२ बलुतेदारांच्या समस्या सोडविणे, प्राचार्य सुधीर महाजन यांच्या पोतदार इंटरनॅशनल स्कूलमधून प्रशिक्षण शिबिरे व स्पर्धात्मक मार्गदर्शन वर्ग सरांनी अनेकवेळा आयोजित केले आहेत. याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शनवर सरांच्या मुलाखाती होऊन याद्वारे समाजजागृतीचे कार्य त्यांनी केलेले आहे. विविध पुस्तकांचे प्रकाशन करणे,नेत्रदान व मरणोत्तर देहदान संकल्प अभियान राबविणे,महिलांचे हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे,दलित आदिवासीसाठी मोफत रोगनिदान शिबिरे आयोजित करणे यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे.

अमरावती शहरातील चित्रा चौकाचे नामकरण मनपाने केल्यानंतरही त्या ठिकाणी रितसर महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाची पाटी मनपाने आजपर्यंत न लावल्यामुळे बनसोड सरांनी स्वतः पुढाकार घेऊन अमरावतीच्या चित्रा चौकात महात्मा जोतीराव फुले चौक हा बोर्ड लावला. ते महात्मा फुले पुतळा सौंदर्यीकरण समितीचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी महात्मा फुले सावित्रीबाई फुले, डॉ.आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम बनसोड सर आवर्जुन आयोजित करीत असतात, मान-सन्मान,गर्व,अभिमान या पलिकडे सरांचे सामाजिक कार्य असल्यामुळे त्यांची बरोबरी करणारे नेतृत्व आजमितीस समाजात उपलब्ध असेल असे वाटत नाही,त्यांच्या जीवन कार्याचा वसा समाजबांधव, युवक-युवती यांनी घेतल्यास सामाजिक संघटन व परिवर्तनाचे कार्य यापुढे अबाधित राहील असे वाटते.

कोरोना काळात या आजाराने सर्व जगाला भयभित केले असताना, प्रा.बनसोड सरांचे कार्य सुरूच होते.शेवटी त्यांना कोरोना आजाराने गाडून हतबल केले असले तरी समाजाच्या शुभेच्छांमुळे त्यांनी या आजारावर मात करून प्रभुत्व मिळाविले आहे.भविष्यात त्यांचा उत्तराधिकारी तयार करणे समाजाचे कर्तव्य असून ही काळाची गरज आहे.अनेक समाज बांधवांचे अमृत महोत्सवी सोहळा,नागरी सत्कार समारंभ इ. बनसोड सरांनी पुढाकार घेऊन साजरे केलेले आहेत.त्यांच्यासारखा दूरदृष्टी,निस्वार्थी समाजसेवक यापुढे निर्माण होणे समाजाची गरज आहे.

राजकीय क्षेत्रात देखील माळी समाजाचे वर्चस्व रहावे यासाठी सरांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. विविध वृत्तपत्रातून त्यांचे प्रबोधन लेख सातत्याने प्रकाशित होत असतात. त्यांनी कुटूंबासोबत बँकॉक, दुबई ,श्रीलंका येथे पर्यटनाच्या निमित्ताने जाऊन माळी समाजाचे संघटन केले आहे.माळी समाजाची दिनदर्शिका,डायरी काढण्याचे श्रेय सुध्दा बनसोड सरांनाच जाते. त्यांची दोन्ही मुले व सुना उच्चशिक्षित असून ते समाजप्रबोधनाचे कार्य करीत असतात.त्यांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नी सौ.नंदाताईचा महत्वपूर्ण सहभाग व सहकार्य लाभलेले आहे.अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला माझा सलाम, सामाजिक जाणीवेचा खळखळता निर्झर,बहुजन चळवळीतील प्रेरणास्त्रोत, कृतज्ञेचा महामेरू,समाज परिवर्तनामधील अवलिया, प्रा. श्रीकृष्ण बनसोड सरांना त्यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. त्यांचे उर्वरित आयुष्य सुख समृध्दी व आनंदाचे जावो तसेच त्यांना समाजसेवेसाठी उदंड आयुरोग्य लाभो ही निर्मिक चरणी प्रार्थना ॥

उदंड आयुष्य । लाभो श्रीकृष्णांना ॥
लाभ हो जनांना । सेवेचाच ॥

महात्मा फुले राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्कार
प्राप्त,

✒️अभंगकार:- साहित्यिक,प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुख्मिणी नगर,अमरावती.भ्र.ध्व. 8087748609