स्त्री शिक्षणाचा पाया फुले दाम्पत्यांनी रचला : किशोर खरात

236

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4जानेवारी):-वेंगुर्ला (आनंदवाडी), जि. सिंधुदुर्ग येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त किशोर खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी खरात बोलताना म्हणाले स्त्रीचे शिक्षण आणि तिचा उद्धार करण्यात आपले संपूर्ण जीवन समर्पित करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाजविकासाच्या कामात देखील सहकार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्यांचा विवाह लहानपणीच म्हणजे वयाच्या फक्त ९ व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून सोसलेल्या जातीयतेच्या वेदना आणि रुढीपरंपरा यांचा दाह सहन करत दोघे मोठे होत होते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना लहाणपणीच कळलं होतं.

महात्मा ज्योतिबा फुले स्वतः शिक्षण घेऊन समाजकार्यात आरूढ झाले. त्यांनी पुन्हा सावित्रीबाई फुले यांना देखील शिक्षित केले. कर्मकांडाला आणि मानवतेच्या विरूध्द असणाऱ्या रुढी परंपरांना सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा कडकडून विरोध होता. हे सर्व जर थांबवायचे असेल तर समाजाला शिक्षणाची गरज आहे याची जाणीव त्यांना झाली. प्रथमतः त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली.

मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ आणि प्रसार करत असताना या दाम्पत्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण व समाजकार्यासाठी घराबाहेर पडावे लागले. ज्योतिरावांच्या कार्यात त्यांनी पूर्णपणे साथ देण्याचा निश्चय त्यांनी केला होता. सावित्रीबाई फुले अगोदर अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले.

समाजात बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या होत्या. फुले दाम्पत्याने १८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृह सुरू केले. केशवपनाविरुद्ध नाभिकांचा संप कामगार नेते नारायण लोखंडे यांनी घडवून आणला.

त्यामागे सावित्रीबाईंचे सहकार्य आणि प्रेरणा त्यांना लाभली. विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन सावित्रीबाईंनी त्याला शिक्षण दिले व त्याला डॉक्टर बनवले. जुलै १८८७ मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईंनी त्यांची सेवा केली.

आजच्या स्त्रियांनी सावित्रीमाईंच्या विचारांवर चालणं गरजेचं आहे. सावित्रीमाईंनी जी शिक्षण रुपी गंगा बहुजनांच्या लेकींच्या दारीं आणली त्यात नाहून प्रत्येक लेकी ने आपलं जीवन समृद्ध करून खऱ्या अर्थाने माता सावित्री माईच्या आदर्शवर चालणं गरजेचे आहे. अजून ही आपल्या भारतीय समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा समूळ संपलेली नाही, याला प्रत्येक सावित्रीच्या लेकीने वैचारिक बुद्धीने विरोध करून जात विरहित विषमता विरहित समतामूलक सामाजाची पायाभरणी करण गरजेचे आहे. समतामूलक सामाजाची पायाभरणी करण गरजेचे आहे.