महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर राजकीय दुकानदारी करणाऱ्यांचा पहिल्यांदा पर्दाफाश करा – तुषार गांधी यांचे आवाहन

104

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.12जानेवारी):-एका बाजूला आपण लोकशाही धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी समाजात जनजागृती करत आहोत, परंतु लोकशाही वाचविण्यासाठी आपण पुढे येत असतानाच भारत स्वातंत्र्य लढ्याला गती देणारे महात्मा गांधी आणि संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर राजकारण करून दुकानदारी करणाऱ्यांना उघडे पाडा, त्यानंतरच लोकशाही विरोधी विरोधकांना नामोहरण करता येईल, असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

दादर येथील शिवाजी मंदिरामध्ये शहीद भागवत जाधव व शहीद देवरुखकर यांच्या पन्नासाव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभा मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ मोकळे, पत्रकार राजू पुरुळेकर, श्याम गायकवाड, सुमेध जाधव आदी उपस्थित होते.

आपण एका बाजूला भारतात संविधानाचा खून होताना पाहत असताना आपण रस्त्यावर का उतरत नाहीॽअसा सवाल तुषार गांधी यांनी बोलताना केला. आपण महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीपर्यंत मर्यादित करून नेमके काय साध्य करीत आहोत? असेही त्यांनी अधोरेखित केले. संविधानाची तुलना आपण मनुस्मृतिशी करून आपण प्रतिवाद्यांची ताकद वाढवत का आहोत? याचा कधी आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का,ॽ असाही प्रतिसवाल तुषार गांधी यांनी व्यक्त केला. भारताचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला जात असताना त्याच्या दोन दिवस आधी राजस्थानमध्ये मडक्यातील पाणी प्यायला म्हणून दलित मुलाची सुवर्ण शिक्षकाकडून हत्या होते.

यामधून आपण नेमका काय संदेश देणार आहोत, याचाही कधी आपण विचार करणार आहोत की नाही ॽ स्वतःला प्रत्येक जण आंबेडकरी चळवळीचा वारसदार सांगतो आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांमध्ये काम करतो, नेमकं त्याला काय साध्य करायचे आहे, हा प्रश्नच पडतो. आंबेडकरी चळवळ चळवळ आहे. प्लेग सारख्या आजाराची साथ पसरली होती त्यावेळी इंग्रज अधिकारी रॅम्सचा खून झाला. हा खून केवळ अस्पृश्य लोक आमच्या घरात येऊन उंदीर मारतात. आमचे घरे अपवित्र करतात ,या केवळ जातीय मानसिकतेतून रॅमची हत्या झाली.

ती मानसिकता ती प्रवृत्ती पुन्हा वाढत असून ती ठेचून काढण्यासाठी म्हातारे झालेल्या पॅंथर यांनी रस्त्यावर उतरण्याची नितांत गरज आहे. घरात पडून मरण्यापेक्षा रस्त्यावर उतरून शहीद व्हा, अशी भावनिक साद श्याम गायकवाड यांनी घातली. आंबेडकरी चळवळी केवळ भाकरीची चळवळ नाही तर ती आत्मसन्मानाची चळवळ आहे, स्वाभिमानाची चळवळ आहे. वंचित, शोषित, पिडीतांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता केंद्र काबीज करावे लागेल, असे वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी बोलताना सांगितले. यावेळी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.