पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप!

309

(मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सप्ताह विशेष)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच तत्कालीन छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सन १९५८या वर्षी मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर मा.शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने दि.१४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला गेला. अधिक रोचक व ज्ञानवर्धक संकलित माहिती श्रीकृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखात वाचा…

नामांतर आंदोलन प्रारंभ इतिहासाची आज ४५ वर्षपेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप! उलटली. दि.२७ जुलै १९७८मध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी अनुभवत असतानांच प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरुवात केली. परंतु बाबासाहेबांच्या समतेच्या विचारांचे निळे वादळ प्यालेल्या कार्यकर्त्यानी गावखेड्यातील बांधवांचे धगधगते मरणतांडव बघीतले आणि पेटून उठले कार्यकर्त्यांचे सूर्यास्त्र. डोक्‍याला निळे कफन बांधून ४ ऑगष्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्याला लावून चळवळीतील नायकांनी पेटलेल्या आभाळातील एक गरुडझेप होती ती. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात लॉंगमार्च काढला गेला. यामध्ये मामा सरदार, कवि.इ.मो.नारनवरे, सुरेश घाटे, बबन बोदांटे, जगदीश थुल, थॉमस कांबळे, जे.के.नारायणे, गोपाळराव आटोटे, नामदेवराव खोब्रागडे, दिलीप पाटील, नरेश वहाणे, भीवा बडगे, सरोज मेश्राम यांच्यासारखे लढाऊ कार्यकर्ते लढण्यासाठी सज्ज झाले होते. याशिवाय दक्षिण नागपूर येथे सुखदेव रामटेके यांच्या नेतृत्वातही एक लढा लढला जात होता. पोलिसांनी दलितांच्या जोगीनगर, भीमनगरात अश्रूधूर फेकले असताना ते कॅच करून पुन्हा पोलिसांकडे भिरकावणाऱ्या कार्यकर्त्यांनी आजही या नामांतर आंदोलनाचा इतिहास डोळ्यात साठवून ठेवला आहे.

नागपूरात चोहिकडे आंदोलन पेटले होते, पश्‍चिमचे आंदोलन ऍड.विमलसूर्य चिमणकर, उत्तरचे आंदोलन प्रा.रणजित मेश्राम, उपेंद्र शेंडे यांच्यापासून तर राजन वाघमारे यांच्यापर्यंत लढला गेला. माजी आमदार शेंडेंचे उपोषण लॉंगमार्चनंतरचा एक महत्त्वाचा टप्पा होता. दक्षिणेत भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, सुधाकर सोमंकुवर, मधु दुधे, विलास पाटील, बाळु हिरोळे, सुनील लामसोंगे अशी असंख्य नावे घेता येतील. वर्धापन दिनाच्या पर्वावर नामांतराचा वणवा कार्यकर्त्यांच्या जणू बुबुळात पेटला असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे चित्र कार्यकर्त्यानी वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला चर्चेतून उभे केले. मराठवाड्यात शिक्षणाची गंगा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणली, औरंगाबाद शहरात मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत असलेल्या मराठवाड्याला प्रगत करण्याचं काम महामानवाने केले आणि त्याच मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा, अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला. त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी लावून धरली.

ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने होवू लागले, नामांतराला विरोध म्हणून जातियवादी लोकांनी दलितांवर अन्याय, अत्याचार करण्यास सुरुवात केली, जाळपोळ करणे आरंभिले. ज्यांना धडपणे माहीत नव्हते त्या दीनदुबळ्या दलितांवर खेडोपाडी अमानुष अत्याचार करण्यात आले. आईचे लेकरू आईविना पोरके झाल्यासारखी दलित बांधवांची अवस्था झाली होती. एवढे होत असतानाही धाडसी भीमसैनिकांनी कधीच माघार घेतली नाही. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय- अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यापर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. जिकडे-तिकडे एकाच नारा गुंजत होता “नामांतर झालेच पाहिज.” नांदेडमध्ये दलित पॅन्थरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भरचौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकाच नारा होता, “नामांतर झालेच पाहिजे” बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले. परभणी जिल्ह्यातही पोचिराम कांबळे यांचे हात-पाय तोडण्यात आले.

त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. जनार्धन मवाडे, संगीता बनसोडे, सुहासिनी बंसोड, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिवीर नामांतराच्या लढ्यात शहीद झाले.

जातीयवादी सरकार नामांतर करत नाही म्हणून दलितमुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंगमार्च आयोजित करून “जिंकू किंवा मरू”, जळतील नाहीतर जाळून टाकतील” अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंगमार्च मधील निष्पाप लोकांवर इंग्रजानाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठीहल्ले केले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, कित्येकांना तुरुंगात डांबले. या निष्पाप दलितांचा गुन्हा काय? तर आपल्या पित्याचे- बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे ही सरकारी मागणी. ज्यांनी दीनदलित, पिचलेल्या आणि उच्चभ्रू समाजाने वाळीत टाकलेल्या समाजातील माणसाला माणूसपण मिळवून दिले, जगण्याचा हक्क दिला, त्या उत्तरदायित्वापोटी बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यावे, ही रास्त व न्यायपूर्ण मागणी गुन्हा ठरवून अमानुष वागणूक देणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्र्याला समजले की बाबासाहेबांची ही लेकरे बाबासाहेबासाठी प्राण द्यायलाही मागेपुढे पाहात नाहीत. जर यांच्या संयमाचा अंत पाहिला तर हेच लोक दुसऱ्यांचा प्राण घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.

त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता “नामांतर, नामांतर, नामांतर…!” चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. १७ वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व दि.१४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद” असा नामविस्तार करण्यात आला. ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली, मराठवाड्यात उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ असावे, ही सर्वप्रथम कल्पना मांडली त्या महापुरुषाचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर झाले परंतु अर्धवट नामांतर झाले, ही खंत आजही भीमसैनिकांच्या मनात आहे. विद्यापीठाचे पहिले नाव “मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद” असे होते.

नामांतरानंतर “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद” एवढेच झाले. नामांतराची लढाई ही प्रतीकात्मक सामाजिक समतेची लढाई होती. दि.१४ जानेवारी १९९४ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी १४ जानेवारी यादिवशी आंबेडकरी जनता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या प्रवेशद्वाराची मनोभावे पूजा करते. जणूकाही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रेद्धेने द्वारापुढे नतमस्तक होतात.
नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नाव लौकिक मिळविला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला, देत आहे आणि पुढेही देत राहील, अशीही अपेक्षा करुया. अंखेर सतरा वर्षाच्या लढाईनंतर औरंगाबाद- छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा विद्यापीठाला दि.१४ जानेवारी १९९४ रोजी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे नाव विस्तारित करण्यात आले. नामांतराची अधिकृत घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री मा.शरद पवार साहेब यांनी केली.

!! मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त सर्व बहुजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.रामनगर वॉर्ड, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३