जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतुन निलंबित करा

90

🔸शासनाकडे हेमकांत गायकवाड,(जळगाव जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन अक्रोश महाराष्ट्र राज्य संघटना) यांची मागणी

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.17जानेवारी):-सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींची दखल न घेणारे,तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या एका दूरध्वनीवर तात्काळ काम करून धन्यता मानणारे अधिकारी शासनाच्या अनेक शासकीय कार्यालयात दिसून येत आहे.नागरिकांच्या मूलभूत समस्यांबद्दल अनास्था दाखविणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना शासनाने निलंबित केले,तर अनेक तळागाळातील नागरिकांच्या समस्या सुटतील यात शंका नाही.

शासकीय कार्यालयातील अनेक विभागांमध्ये विशेषतः शासकीय अनेक खात्यांत काही कामचुकार अधिकारी सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात.या दुर्लक्षमागे अधिकारी व कंत्राटदार,दुकानदार उद्योगपती,विकासक यांच्याशी काही साटेलोटे तर नाही ना?अशी शंका नागरिकांच्या मनात आल्याशिवाय राहात नाही?समस्यांनी पीडित असलेल्या तक्रारदारांना अधिकारीवर्गाच्या कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात.काही अधिकारी नागरिकांचे प्रश्न,समस्या,तक्रारीचे निवारण करीत नसल्याने शासन व प्रशासनाच्या प्रतिमेस गालबोट लागत आहे.

जनतेच्या समस्या प्रश्न,तक्रारींचे निवारण करणार नाहीत अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करुन महाराष्ट्र शासनाचा,तसेच प्रशासनाचा कारभार पारदर्शक आहे हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे.शासन,प्रशासन हे सामान्य जनतेचेच आहे असा संदेश जनतेमध्ये जाईल.तरी दुर्लक्ष करीत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर प्रशासनाने व शासनाने निलंबनाची कारवाई करावी.अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन अक्रोश महाराष्ट्र राज्य संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी एका प्रसिद्धी पञकान्वये केली.