जागतिक महिला दिनी सावित्रीमाईंच्या लेकींना दिले राज्यस्तरीय महिला अधिवेशनाचे निमंत्रण !…

205

 

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव : सत्यशोधक, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाज निर्माण करून मानवाचा उद्धार केला. सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त रविवार दि.१० मार्च रोजी सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगाव, तालुका खंडाळा येथे होत आहे.
या अधिवेशनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई वनकर ( अध्यक्षा – सत्यशोधक समाज महिला संघ महाराष्ट्र राज्य) प्रमुख उद्घाटक रूपालीताई चाकणकर (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य महिला आयोग) प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे, ॲड.वैशालीताई डोळस, सुजाताताई गुरव, दर्शनाताई पवार, ॲड.वासंती नलावडे, झेबूनिरसा शेख उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे विशेष म्हणजे सूत्रसंचालन पासून तर आभारापर्यंत संपूर्ण नेतृत्व महिला भगिनी करणार आहेत. राज्यस्तरीय प्रथम महिला अधिवेशनाला महामातांच्या लेकिंनी उपस्थिती द्यावी यानिमित्त जिजाऊ ब्रिगेड धरणगाव तालुकाध्यक्षा वैशालीताई पवार, इंदिरा गांधी विद्यालयाच्या संचालिका अरूणाताई पाटील, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई महाजन, माजी नगराध्यक्षा कल्पनाताई महाजन, संगीता माळी, कविता देशमुख, ललिता वाघ (सामाजिक कार्यकर्त्या) आदी भगिनींना सत्यशोधक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिका दिल्यात. याप्रसंगी सर्व भगिनींनी उपस्थित राहू असे सांगितले. यावेळी सत्यशोधक समाज संघ पदाधिकारी पी डी पाटील, हेमंत माळी, निलेश पवार, मयूर भामरे, राहुल माळी, हर्षल वाघ, जयेश महाजन, तुषार पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.