सारेच शेतकरीपुत्र : कींव नाही काडीमात्र !

58

[23 डिसेंबर – राष्ट्रीय शेतकरी दिन]

आज २३ डिसेंबर २०२० म्हणजे ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ एकीकडे भारत इ.स.२०२० मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ साजरा होतो. मात्र त्याच देशात या शेतकऱ्याला कुठलीही सुविधा मिळत नाही आणि दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. आज शेतकरी अत्यंत केविलवाणा झालेला आहे. शेतकऱ्याला सन्मानाने बळीराजा म्हटले जाते; मात्र प्रत्यक्षात हा राजा अतिशय दिनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी हा बळीराजा ठरलेला आहे. शेतीसाठी कर्ज काढून नापिकीमुळे आत्महत्या करू लागला आहे. भारत सरकारने, प्रत्येक भारतीयाने व समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्याप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

या शेतकरी दिनाव्यतिरिक्त हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘कृषी दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. याही दिवसाचा हवा तसा परिणाम शेतकर्‍यांच्या जीवनात झाल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्रातच पुन्हा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून २९ ऑगस्टला साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी त्यांचे नातू आणि तत्कालीन राज्य सरकारमधील कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.

परत आणखी एका विशेष दिवसाची भर पडली. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने सन २०१७ पासून १५ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय महिला शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्याचीही अंमलबजावणी सुरू झालेली पहावयास मिळत आहे. म्हणतात ना, “एक ना धड, भाराभर चिंध्या !” अगदी असे साजेसे चित्र डोळ्यासमोर तरळू लागले आहेत. केवळ आपल्या नावाचा ‘उदो-उदो’ व्हावा. माझा बडेजाव त्यांनी राखावा. हार-तुऱ्यांनी माझे स्वागत व्हावे. अर्थात ‘मला पहा आणि फुले व्हा!’ एवढ्यापुरतंच ही नाटकं असावीत, अशी शंका येणे साहजिकच आहे. एवढा गवगवा शेतकऱ्यांविषयी आहे, तर मग त्यांच्यावर नवीन नियम व कायदे जबरीने का लादले जातात? त्यांना आपल्या क्षुल्लकशा मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे आदी मार्गांचा अवलंब का करावा लागतो? आज फार मोठ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक विवंचनेतून हा शेतकरी जात आहे. कोणत्याही समस्येने जराही बळीराजाला-शेतकऱ्याला ग्रासले असेल, तर याला आपला मदतीचा हात नक्की दिला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकांनी याबाबत आपला मदतीचा हात समोर केला पाहिजे. सध्याची परिस्थिती गंभीर झाली आहे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच ‘शेती’ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. म्हणून भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस २३ डिसेंबर हा ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) त्यांनीच स्थापना केली. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये सन २००१ साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तो आजही सुरू आहे. देशातील मंत्री, अधिकारी, उद्योजक, कर्मचारी, व्यापारी आदी सर्वच शेतकर्‍यांची बेईमान संतान आहे, असे खेदानेच म्हणावे लागत आहे. बापाचे कष्ट जवळून पाहिले असतानाही त्याचा कैवार घेण्यास कोणी तयार होत नाही. ‘फिक्स रेट’ सांगणाऱ्या व्यापाऱ्यांकडे भाव करत नाही.

मात्र तो अन्नदात्याकडे शेतमाल व भाजीपाल्याचा भाव कमी करण्याचा आग्रह धरतो. व्यापारीसुद्धा ठोक व्यवहारात भाव कमी करण्यास भाग पाडतो व आपण मात्र चिल्लर विक्री म्हणून चढ्या दराने विकतो. गडगंज पैसा कमावतो. व्वा रे पुत्रा, धन्य तुझी पितृभक्ती ! म्हणूनच आज परत म्हणावसं वाटतंय, मातीतून सोन्याहून मोल्यवान असं अन्न उगवणारे तुम्ही, काळाच्या या ओघाला घाबरू नका! तुमच्या मनगटात ती धमक आहे, ज्याला घाबरून हा दुष्ट काळसुद्धा समोर उभारणार नाही. लढा, अत्तापर्यंत लढत आलात, तोच लढा चालू ठेवा. एक ना एक दिवस या जगाला तुमचे अस्तित्व मान्य करावेच लागेल. या निमित्ताने एवढंच सांगावंस वाटतंय, एक तास जेवायला उशीर झाला तर आपली काय अवस्था होते? जेवणात जर फक्त पाणीच मिळायला लागलं तर मग काय होईल? कल्पनाच करवत नाही! पण, आपले शेतकरी असेच मरत राहिले तर शेती उरणारच नाही.

वेळीच उपाय, योग्य निर्णायक योजना, त्यांना मानसिक आधार, त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण, या व अशा अनेक योजना राबवून, या दुष्ट चक्रातून वेळीच बाहेर काढावे लागेल. बळीराजाचं अस्तित्व नाकारलं, तर या जगातील समस्त मानवजातीचं अस्तित्व संपुष्टात येण्यास कितीसा वेळ?सगळ्यांनी अवती-भवती असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा स्वाभिमान जराही न दुखावता, हवी तेवढीच आणि तितकीच मदत अगदी स्वेच्छेने केली पाहिजे. त्याच्या कष्टाची कदर झाली पाहिजे. त्याच्यासाठी असलेल्या सर्व शासकीय योजना; सोयी-सवलती निव्वळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष त्याच्या बांधापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अनेक बांधवांचे शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही किंवा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा? हे त्यांना कळत नाही.

समाजात कितीतरी शेतकरी आधुनिक आणि पारंपारिक शेतीत योग्य तो समन्वय साधून शेती करू शकत नाही. त्याला योग्य तो शेतीपूरक जोड-धंदा कसा करायचा? याबाबत माहिती आपण देऊ शकतो. अन्नदाता शेतकरी म्हणून अत्यंत सुखी-समाधानी आणि तृप्त जीवन जगण्यास धीर आपण त्यांना देऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात आपल्याला या व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांना या विषयी माहिती देऊन शक्य तेवढी मदत त्यांना केली पाहिजे. चला तर मग आज ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ निमित्त एक निर्धार करू आणि आज आपला शेतकरी ज्या परिस्थितीत जगतोय त्याला यातून आपल्या मदतीने काढू. आपणास शक्य होईल तेवढी मदत करण्यास कटिबद्ध आहोत, असा निर्धार आपण या निमित्त्याने करुया आणि “इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो” अशी मनोकामना उरी बाळगुया !

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे.
मु.पिसेवडधा, पो.देलनवाडी,
ता.आरमोरी, जि.गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com