पुरोगामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक -श्रीमंत राजे सयाजीराव गायकवाड!

29

(श्रीमंत राजे सयाजीराव गायकवाड स्मृती दिन)

श्रीमंत राजे तिसरे सयाजीराव खंडेराव गायकवाड यांचे जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड असे होते. त्यांचा जन्म कौळाणे, ता. मालेगांव, जिल्हा नाशिक येथे दि.११ मार्च १८६३ रोजी राजघराण्यात झाला. हे इ.स.१८७५ ते इ.स.१९३९ यांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे व कर्तृत्ववान संस्थानिक होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरिता ते विशेषत्वाने ओळखले जातात. त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न…दिवाण सर टी.माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. दि.२८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर महाराज सयाजीरावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या.

प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू केले. राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला. त्यांनी सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले. तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. महाराजांनी श्रीसयाजी साहित्यमाला व श्रीसयाजी बाल ज्ञानमाला या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली.

त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली; फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत, यादृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले. संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. राजे सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत. सामाजिक महाराजांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे.

पडदापद्धती, बालविवाह व कन्याविक्रय यांवर बंदी, मिश्र विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह आदी सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली व त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू जसे – लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीधी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.

महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.श्रीमंत राजे सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत. त्यांचे नियोजन करताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असत. अशा प्रकारची मदत करताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे.

शंभर वर्षांपूर्वी महाराजांनी बडोदा व आजुबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुराचे व उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा मिळवून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. “जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे” असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले. शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळात व अतिवृष्टीच्या काळात मदत केली.

सयाजीराव गायकावाड महाराजांना प्रवासाची खुप हौस होती. म्हणून त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. बाळ गंगाधर टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे दि. ६ फेब्रुवारी १९३९ रोजी अशा या जाणत्या राजांचे श्रीमंत सयाजीराव महाराजांचे निधन झाले.
!! त्यांच्या कर्तबगार स्मृतींना पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व लेखक:-निकोडे कृष्णकुमार गुरुजी.
(मराठी-हिंदी साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाजवळ,
गडचिरोली जि. गडचिरोली.
भ्रमणध्वनी – ७७७५०४१०८६.
email – nikode.krishnakumar@gmail.com