संत वामनभाऊ यांच्या दिंडीस इतर दिंडीप्रमाणे बसने जाण्यास परवानगी द्यावी- मा.आ.भीमसेन धोंडे यांची मागणी

26

🔸गहिनीनाथगडाच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18जून):-महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावरून दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीला सरकारने परवानगी देऊन वारीचा मार्ग मोकळा करावा.संत वामनभाऊ यांच्या दिंडीस ईतर दिंडीप्रमाणे किमान बसने जाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आष्टी,पाटोदा,शिरुर विधानसभा मतदार संघाचे मा.आ.भीमसेन धोंडे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.
गहिनीनाथगडाच्या या पायी दिंडी वारीच्या १२५ वर्षाच्या परंपरेला खंड पडू देऊ नये.

श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हे वारकरी संप्रदायाचे मुळ उगमस्थान आहे.नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ यांची संजीवन समाधीस्थळ आहे.गहिनी प्रसादे निवृती दातार म्हणुन त्यांचे पासूनच वारकरी संप्रदायाचा आरंभ होतो.दरवर्षी या गडावरून वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरला जाते.संत वामनभाऊ महाराज यांनी १२५ वर्षापूर्वी या दिंडीची सुरवात केली होती.ही परंपरा आजही महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे.

सध्या कोरोना महामारीमुळे सरकारने या दिंडीला परवानगी दिली नाही.त्यामुळे भाविक भक्तांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली आहे.तथापि गहिनीनाथ गडाच्या वारीचा विषय हा लाखो भक्तांच्या भावनेचा आणि श्रध्देचा विषय आहे.ही परंपरा अखंड सुरु रहावी यासाठी सरकारने कोविड नियमांचे पालन व शासकीय नियमाप्रमाणे या वारीला बसने पालखी घेऊन जाण्याची तरी परवानगी द्यावी.अशी मागणी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केली आहे.यावेळी महंत विठ्ठल महाराज,शंकर देशमुख उपस्थित होते.