गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा नादच खुळा; दीड एकरात बनवली दोन कोटींची विहीर, कारण…

44

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.7फेब्रुवारी):-सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी अन सुलतानी संकटात पिचला जात आहे. मात्र या नेहमीच्या दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी, एका शेतकऱ्याने अजबचं नाद केलाय. तब्बल दीड एक्कर शेतामध्ये, 2 कोटी रुपये खर्च करून विहीर बनवलीय. यामुळं आता 3-4 वर्ष जरी पाऊस झाला नाही, तरी जवळपास 50 एक्करवर शेती बागायती होऊ शकते.

बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या, पाडळसिंगी गावचे शेतकरी मारोती बजगुडे. शेतकरी मारोती बजगुडे यांना 12 एक्कर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने, बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यानी आपल्या दीड एक्कर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरविले.

मात्र सुरूवातील यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर यशस्वीपणे मात करत, मारोती बजगुडे यांनी तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली होती. सुरूवातीला या विहीरीतून निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना 15 ते 20 लाख रूपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून, दररोज 80 मजूर यासाठी काम करीत होते. तर 10 हायवा यातील माती व दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. अखेर ही विहीर पूर्ण झाली असून या विहीरीसाठी जवळपास दोन कोटींचा खर्च झाल्याचे बजगुडे यांनी सांगीतले.

या अवाढव्य विहीरीत 10 कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता आहे. लांबून पाहील्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. अशा प्रकारची ही विहीर असून महाराष्ट्रात ती एकमेव ठरण्याची शक्यता आहे.मारोतीराव बजगुडे यांना असलेल्या 12 एकर शेतीपैकी 8 एकरमध्ये त्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच या विहीरीमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. ही विहीर महाराष्ट्रात एकमेव ठरण्याची शक्यता आहे.