दुर्मिळ व मौलिक साहित्य ही राष्ट्रीय संपत्ती!

33

(राष्ट्रीय साहित्य अकादमी विशेष)

साहित्य अकादमीच्या या प्रयत्नांमुळे आपल्या मातृभाषेतून अन्य विविध भारतीय भाषांतील साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या वाचकांच्या साहित्यिक- सांस्कृतिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे, त्या अधिक सखोल करण्याचे आणि भारतीय विचार व साहित्य यांच्यामागील एकात्म पार्श्वभूमी यांचे भान जागृत करण्याचे अकादमीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. ही ज्ञानवर्धक माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- ‘अलककार’ यांच्या या लेखांशातून जरूर वाचा… आपल्या विविधस्वरूपी उपक्रमांची कार्यप्रणाली व पद्घती निश्चित करण्यासाठी अकादमीने लिखित संविधान तयार केले आहे. त्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार अकादमीचे कार्य चालते. तिने एकूण चोवीस प्रादेशिक भारतीय भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्या प्रत्येक प्रादेशिक भाषेतील एकूण दहा सदस्यांचे सल्लागार मंडळ त्यामार्फत स्थापले जाते व त्या त्या प्रादेशिक भाषेतील अकादमीकृत कार्याचे आयोजन किंवा सुसूत्रीकरण या सल्लागार मंडळामार्फत केले जाते. संबंधित भाषेतील वेगवेगळे उपक्रम, पुरस्कार, अनुवादयोजना राबविण्यासाठी ग्रंथनिवड वगैरे अनेक बाबतींत हे सल्लागार मंडळ तिला सल्ला देत असते. त्यानुसारच ती कार्यवाही करते. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चार प्रादेशिक विभागांसाठी वेगवेगळी चार प्रादेशिक विभागीय कार्यालये तिने स्थापन केली आहेत.

त्या त्या प्रादेशिक विभागांतील भाषांमध्ये परस्पर आदान-प्रदान घडवून आणणे, हे या विभागीय कार्यालयांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवी दिल्ली येथे तिचे मुख्य मध्यवर्ती कार्यालय आहे. बडोदे येथे तिचे प्रकल्प कार्यालय असून तेथे मौखिक तसेच आदिवासी साहित्याचे जतन व विकासाचे कार्य चालते. भारतीय भाषांतील साहित्याचे अभिलेखागारही तेथे आहे. नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयात तसेच बंगलोर व कोलकाता येथील विभागीय कार्यालयांत बहुभाषिक ग्रंथांचा विपुल, प्रचंड व मौलिक साठा असलेली वैशिष्ट्यपूर्ण व समृद्घ ग्रंथालये आहेत. चोवीस प्रादेशिक भाषांतील सुमारे दीड लाख ग्रंथ हे या संग्रहालयाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.

साहित्य अकादमी ही भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी भारतातील राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख साहित्यसंस्था आहे. मार्च १९५४ मध्ये नवी दिल्ली येथे ही साहित्यसंस्था स्थापन झाली. ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतील स्वायत्त स्वरूपाची संस्था असून तिला भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे पूर्णतः आर्थिक अनुदान दिले जाते. सन १९५६मध्ये साहित्यसंस्था म्हणून तिची अधिकृत नोंदणी झाली. या अकादमीचे प्रमुख कार्य भारतातील साहित्यविषयक पूर्वसंचिताचे जतन करून नवीन स्वतंत्र तसेच अनुवादित वाङ्‌मयाच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, हे आहे. अकादमी विविध प्रादेशिक भाषांतील लेखकांना उत्तेजनार्थ पारितोषिके व मानचिन्हे देऊन गौरवीत असते. प्रकाशने, अनुवाद, परिसंवाद, कार्यशाळा, देशाच्या विविध भागांत साहित्य मेळाव्यांचे आयोजन, लेखकांच्या वाचकांशी भेटी घडवून आणणे, असे नानाविध उपक्रम राबवले जातात.

भारतीय भाषांतील समकालीन वाङ्‌मयाची सूची तयार करणे, समकालीन लेखकांच्या उत्कृष्ट व निवडक साहित्यकृतींचे संग्रह प्रकाशित करणे, आधुनिक भारतीय भाषांतील वाङ्‌मयाचा इतिहास व विकास यांचा विस्तृत आढावा घेणारे प्रमाणभूत ग्रंथ इंग्रजी व हिंदी भाषांत तयार करून घेऊन ते प्रकाशित करणे, प्राचीन संस्कृत महाकाव्ये व पुराणे यांच्या सटीप आवृत्त्या प्रसिद्घ करणे आदी अनेक योजना व उपक्रम अकादमीने आजपावेतो राबविले आहेत. भारतीय भाषांचे इतिहास प्रकाशित करून भारतातील प्रमुख भाषांच्या विकासाला उत्तेजन देणे व त्यांना जास्तीत जास्त परस्परांच्या सान्निध्यात आणणे, हे उद्दिष्ट अकादमीने साध्य केले आहे. या प्रक्रियेला मदत म्हणून साहित्य अकादमीने भारतातील प्रादेशिक भाषांमधील प्रसिद्घ पुस्तकांचे इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची व विविध भारतीय भाषांचे इतिहास प्रसिद्घ करण्याची योजना कार्यान्वित केली आहे.

अकादमी दर वर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात साहित्य-महोत्सव सप्ताह आयोजित करते. या आठवडाभरात काही विशिष्ट विषयांवर प्रकल्प योजिले जातात. याबरोबरच तिने गेल्या सुमारे पाच सहस्रकांच्या कालावधीतील उत्कृष्ट निवडक भारतीय साहित्यकृतींचे संकलन एकूण दहा खंडांत प्रकाशित केले आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांतील आदिवासींच्या साहित्याचे भाषांतर व प्रकाशन हा तिने हाती घेतलेला आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. बडोदे येथील कार्यालयात तो कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने एक संयुक्त प्रकल्प राबविला असून त्याअंतर्गत शंभर भारतीय अभिजात साहित्यकृतींच्या भाषांतराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. भारतीय साहित्याच्या अभिलेखागाराची योजना हा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. या प्रकल्पांतर्गत चित्रफिती, दृक्‌ध्वनिफिती, श्रवणफिती, सीडी आदी तांत्रिक साधनांद्वारे भारतातील दुर्मीळ व मौलिक साहित्यधनाचे दस्तऐवजीकरण तसेच श्रेष्ठ भारतीय साहित्यिकांची मूळ हस्तलिखिते, छायाचित्रे आदी सामग्री जतन करण्याच्या काही योजना राबविल्या जातात.

साहित्य अकादमी एकूण चोवीस प्रादेशिक भाषांत व इंग्रजी भाषेतही पुस्तके प्रकाशित करते. या योजनेंतर्गत भारतीय भाषांतील पारितोषिकप्राप्त पुस्तकांचे अनुवाद केले जाते. वेगवेगळ्या प्रकारांतील सुमारे चार हजार पुस्तके प्रकाशित केली आहेत. अकादमी दर वर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात साहित्य-महोत्सव सप्ताह आयोजित करते. या आठवडाभरात काही विशिष्ट विषयांवर प्रकल्प योजिले जातात. याबरोबरच गेल्या सुमारे पाच सहस्त्रकांच्या कालावधीतील उत्कृष्ट निवडक भारतीय साहित्यकृतींचे संकलन एकूण दहा खंडांत प्रकाशित केले आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांतील आदिवासींच्या साहित्याचे भाषांतर व प्रकाशन हा हाती घेतलेला आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने एक संयुक्त प्रकल्प राबविला असून त्याअंतर्गत शंभर भारतीय अभिजात साहित्यकृतींच्या भाषांतराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. भारतीय साहित्याच्या अभिलेखागाराची योजना हा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. या प्रकल्पांतर्गत चित्रफिती, दृक्‌ध्वनिफिती, श्रवणफिती, सीडी आदी तांत्रिक साधनांद्वारे भारतातील दुर्मीळ व मौलिक साहित्यधनाचे दस्तऐवजीकरण तसेच श्रेष्ठ भारतीय साहित्यिकांची मूळ हस्तलिखिते, छायाचित्रे आदी सामग्री जतन करण्याच्या काही योजना राबविल्या जातात.

साहित्य अकादमी प्रतिवर्षी मान्यताप्राप्त चोवीस प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट सर्जनशील साहित्यकृतींसाठी चोवीस आणि अनुवादित ग्रंथांसाठी चोवीस असे एकंदर अठ्ठेचाळीस पुरस्कार देत असते. इंग्रजी भाषिक ग्रंथांसाठीही पुरस्कार ठेवले आहेत. स्वतंत्र साहित्यकृतीसाठी रु.एक लाख आणि मानचिन्ह व अनुवादित कृतीसाठी रु.पंचवीस हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. शिवाय साहित्यातील मौलिक योगदानाबद्दल साहित्यिकांना विशेष गौरववृत्ती दिली जाते. या संदर्भात मराठी साहित्यातील विशेष उल्लेखनीय दोन घटना म्हणजे साहित्य अकादमीने सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना पुरस्कार देण्याची योजना सन १९५५पासून सुरू केली.साहित्य अकादमीच्या वतीने निरनिराळ्या राज्यांतील गुणी, तरुण लेखकांना प्रवासशिष्यवृत्ती दिली जाते. त्यांनी भारतातील अन्य राज्यांमध्ये जाऊन तेथील लेखकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, तसेच तेथील प्रादेशिक साहित्य- संस्कृतीचा परिचय करून घ्यावा, या उद्देशाने अशा शिष्यवृत्त्या दिल्या जातात.

सांस्कृतिक देवाण-घेवाण योजनेच्या अंतर्गत भिन्न भिन्न प्रदेशांतील-भाषांतील लेखकांनी परस्परांचे साहित्य अनुवादित व प्रकाशित करणे, तसेच दोन भिन्न भाषिक राज्यांमध्ये लेखक-विद्वानांची परस्पर आवक-जावक करणे, असे अनेकविध उपक्रम राबविले जातात. भारतातील सर्व राज्यांमधील प्रादेशिक भाषांमध्ये परस्परजवळीक साधावी, वाङ्‌मयीन आदान-प्रदान व्हावे, त्यायोगे साहित्यिक-सांस्कृतिक एकात्मतेची जाण वृद्घिंगत व्हावी आणि देशाच्या सांस्कृतिक व भावनात्मक ऐक्यास हातभार लागावा, ही साहित्य अकादमीची भूमिका या सर्व प्रकल्प व उपक्रमांमागे कार्यरत आहे, हे येथे उल्लेखनीय!

✒️संकलक व सुलेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- ‘अलककार'(वैभवशाली भारताच्या साहित्य-संकृतीचे गाढे अभ्यासक)मु. रामनगर, वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, मो. नं. ७७७५०४१०८६.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com