अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावोगावी कार्यक्रम करून जनजागृती करावी : रुपालीताई चाकणकर

89

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.22ऑगस्ट):- अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावोगावी कार्यक्रम करून जनजागृती करावी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले. तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला यावरून आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली.

तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करत असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे.

तसेच पुण्यामध्ये पुत्र प्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पीडितेच्या पती, सासू , सासरे यांना अटक झाली होती आणि आज फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे.

या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई करेलच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा आहे हे माझं मत आहे आणि हे कारण समूळ नष्ट करणे ही तुमची, आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी आहे.

या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असून अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे व समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृती ची आवश्यकता आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगानी ह्याची गंभीर दखल घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ला पण मी अशा मुद्द्यानवर जनजागृती करण्याचे आव्हान करीत आहे.