गडचिरोली जिल्ह्यात सहा तालुक्यांमधील 18 नवीन कोरोना बाधितांचे अहवाल पॉझिटीव्ह

33

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔸आजच्या बाहेरून आलेल्या 41 नवीन रुग्णांपैकी 25 रूग्ण जिल्हयाबाहेरचे*

🔹जिल्हयातील एकुण बाधित 115 पैकी 107 नोंदी जिल्हयातील. सद्या ४७ सक्रिय कोरोना बाधित

गडचिरोली(5 जुलै):-गडचिरोली जिल्हयात सकाळी जिल्हयाबाहेरील 23 कोरोना बाधित रूग्ण अढळल्यानंतर सहा तालुक्यातील 18 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. नव्याने 18 रूग्ण सापडले, यामधील 17 गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणातील होते तर एक अहेरी येथील या पुर्वी कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील वडील आहेत. यामुळे जिल्हयातील एकुण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 115 झाली, त्यामधील 8 रूग्णांच्या नोंदी त्यांच्या स्वजिल्हयात करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्हयातील एकुण कोरोना रूग्णांच्या नोंदी सद्या 107 राहणार आहेत. पैकी इतर राज्यातील बाकी नोंदी त्या त्या राज्यात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजरोजीपर्यंत 59 रूग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे दवाखान्यातून घरी सोडण्यात आले आहेत. सद्या जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 47 आहे. तसेच जिल्हया बाहेरील उपचार घेत असलेले इतर 8 रूग्ण आहेत.

आज 18 रूग्ण आढळून आलेल्यांपैकी 2 महिला व 16 पुरूष आहेत. यामध्ये अहेरी येथील एक पुरूष कोरोना बधिताच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या यादीतील आहे. तर इतर 17 रूग्णांमध्ये तामिळनाडू येथून ट्रकने आलेले 8 कामगार, ठाणे येथून आलेले 3 लोकांचे एक कुटुंब, वाशिम वरून परतलेले दोघांचे कुटुंब, हैद्राबाद येथून एकजण, अरूणाचल प्रदेश मधून आलेला बीएसएफचा एक जवान, जम्मू आणि कश्मिर येथून आलेला एक सीआरपीएफचा जवान आणि दिल्ली येथून आलेल्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. यांना गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या 18 व्यक्ती जिल्हयातील आरमोरी तालुक्यातील -1, धानोरा तालुक्यातील-5, एटापल्ली मधील 3, चामोर्शी मधील -1, गडचिरोली तालुक्यातील 7 तर अहेरी तालुक्यातील -1 याप्रमाणे आहेत.
आत्तापर्यंत जिल्हयात आढळून आलेल्या 115 कोरोना रूग्णांमध्ये 26 सीआरपीएफचे जवान, 2 बीएसएफचे जवान, 43 कामगार तर इतर 44 व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्हयात नागरिकांनी अधिक सर्तक राहणे गरजेचे आहे : जिल्हाधिकारी दीपक सिंगला

जिल्हयात कोरोना संख्या एकदम एका दिवशी मोठया संख्येने वाढल्यामुळे प्रशासन अधिक काळजी घेत आहे. यामध्ये नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग होवू नये म्हणून अधिक सर्तक राहणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. तोंडाला मास्क किंवा रूमाल लावणे गरजेचे आहे. जिल्हयाबाहेरून आलेल्यांच्या नोंदी प्रशासनाकडे करा. तसेच स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.