शिवभोजन थाळी ठरतंय ! गरजू गरिबांसाठी आधार

29

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

🔸चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यात तब्बल 79 हजारांवर थाळींचे वाटप

चंद्रपूर(दि.9जुलै): महाराष्ट्रामध्ये गरजू, गरीब, विमनस्क नागरिकांसाठी भोजन मिळावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण शिवभोजन योजना 26 जानेवारी पासून सर्व महाराष्ट्र मध्ये सुरू झाली. शिवभोजन योजना नागरिकांच्या पसंतीस उतरली. दहा रुपयाला मिळणारी शिवभोजन थाळी आता पाच रुपयाला मिळायला लागली. मंत्री मंडळातील निर्णयाप्रमाणे शिवभोजन थाळी पुढील तीन महिने पाच रुपये या दरातच मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये तब्बल 79 हजार 424 थाळींचे पॅक फूडद्वारे वितरण झाले आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये शिवभोजन थाळी प्रत्येक गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शिवभोजन थाळी नागरिकांच्या पसंतीस आणण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यामध्ये 22 शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर तालुका स्तरावर सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन, तालुकास्तरावरील पुरवठा विभागाचे कर्मचारी सर्व गरीब, गरजू नागरिकांना शिवभोजन मिळावे यासाठी अविरत कार्य करीत आहे. कोरोनाच्या काळामध्ये गरजू, गरीब, स्थलांतरित, कष्टकरी, विमनस्क तसेच अनेक नागरिकांच्या हाताला काम नाही , अशा नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी आधार होत आहे.

स्वच्छता व सुरक्षेची विशेष काळजी:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी वाटप करतांना शिवभोजन केंद्राद्वारे विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागरिकांची गर्दी होऊ न देता व सुरक्षित अंतर ठेवून भोजन हे थाळीद्वारे वाटप न करता फुड पॅकद्वारे वाटप करण्यात येत आहे. शिवभोजन केंद्रावर स्वच्छतेची, सुरक्षतेची काळजी प्रामुख्याने घेण्यात येत आहे. नागरिकांना सॅनीटायजर, हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लेखाजोखासाठी शिवभोजन ॲप:

पुरवठा विभागाला थाळींच्या वितरणाची दैनंदिन माहिती मिळावी यासंदर्भात लेखाजोखा ठेवण्यासाठी स्वतंत्र शिवभोजन अॅप सुरू केली आहे. या संबंधित सर्व माहिती ॲपमध्ये शिवभोजन केंद्र चालक नोंद करीत असतात. याद्वारे दैनंदिन भोजनाचा प्रकार तसेच लाभार्थ्यांचे नाव, फोटो याची नोंद घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे नागरिकांना भोजनाच्या गुणवत्ते संदर्भात अभिप्राय सुद्धा या अॅपद्वारे नोंदविता येतो.

असे आहे शिवभोजन थाळींचे वितरण:

जिल्ह्यामध्ये 22 केंद्राद्वारे शिवभोजन थाळी फुड पॅकद्वारे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत वाटप करण्यात येते. जून महिन्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आगमन नामदेव सावजी भोजनालय, मयुर स्नॅक्स कॉर्नर, साईकृपा भोजनालय, सुकुन बिर्याणी सेंटर, वैष्णवी रेस्टॉरंट ॲड भोजनालय, विशाखा महिला बचत गट या केंद्रांनी एकूण 32 हजार 239 शिवभोजन थाळींचे वितरण केले आहे.

शिवशाही थाळी खानावळ बल्लारपुर, ज्योती कॅटरर्स राजुरा, सृष्टी कॅटरर्स समाधान फाउंडेशन चिमुर, शिवभोजन केंद्र ब्रम्हपुरी ,रवि खानावळ वरोरा,लकी सोशल क्लब सावली येथे ,फलके भोजनालय गोंडपिपरी, सादु बहुद्देशिय संस्था भद्रावती, मो. इकबाल खानावळ वरोरा, संजय कॅटरर्स ॲड सर्विसेस मुल, मातोश्री महीला बचत गट लोनवाही सिंदेवाही, परमात्मा एक भोजनालय नागभीड,विजय भोजनालय नागभीड, रमा बाई महिला बचत गट घुग्गुस चंद्रपूर, मुस्कान हॉटेल पोंभुर्णा, दुष्यंत चायनिज रेस्टॅांरंट मुल या केंद्रांनी एकूण 47 हजार 185 शिवभोजन थाळींचे वितरण केले आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व तालुका, ग्रामीण मिळून असे एकूण 79 हजार 424 थाळी पॅक फूडद्वारे वाटप करण्यात आले आहे.