राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे – डॉ. नामदेव कोकोडे

75

🔸पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले उद्घाटन- राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन संपन्न

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15नोव्हेंबर):-थोर तत्त्वचिंतक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्यात राष्ट्रधर्म, मानवधर्म आणि विश्वधर्म पानोपानी दिसून येते.त्याच बरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि विशेषतः शोषितांच्या उत्थानासाठी त्यांचे विचार साहित्य असून यावर अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत संमेलनाध्यक्ष डॉ. नामदेव कोकोडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत साहित्य विचार परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे श्रीगुरुदेव सेवा मंडळ आणि संपुर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सदर दोन दिवसीय संमेलन चे अध्यक्ष म्हणून डॉ. कोकोडे होते. या संमेलनाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले .

तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख , माजी सभापती अलकाताई आत्राम, राहुल संतोषवार, पोंभुर्णा नगराध्यक्ष सौ. सुलभाताई पिपरे, अजित मंगळगिरीवार, दीपक सातपुते , सरपंच सुप्रीम गद्येकार,भाऊ बराटे, एड. किरण पाल , प्रफुल्ल निमसरकार ,आरके गुरुजी , पोलिस पाटील अशोक पाल, उपसरपंच शितल पाल आदींची उपस्थिती होती.

उद्घाटक ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,राष्ट्रसंतांनी मनुष्य घडविणारा ग्रंथ ग्रामगीता लिहिलेला असून त्यानुसार प्रत्येकाने कृती करावी . राष्ट्रसंतांनी सांगितलेली जीवनमूल्ये आत्मसात केली पाहिजे. गावागावात व्यसनमुक्तीचा संकल्प झाला पाहिजे. प्रत्येकाने प्रयत्नवादी राहून उत्तम कर्माचा मार्ग निवडला पाहिजे असे विचार त्यांनी मांडले . देवराव भोंगळे आणि भाऊ बराटे यांनी आयोजन समितीचे संमेलन घेतल्याबद्दल कौतुक केले.बंडोपंत बोढेकर म्हणाले, जनमनात परिवर्तन करण्याची क्षमता राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्यात आहे, असे ते म्हणाले.

साहित्य दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली. पालखीत राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेसमवेत अभंगगाथा , गोवंश सुधार ग्रंथ, श्रीतुकारामगाथा, बुध्द आणि त्यांचा धम्म, ज्ञानेश्वरी, भारतीय संविधान आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. साहित्य दिंडीत शालेय विद्यार्थी, महिला, पुरूष सहभागी झाले होते.
उद्घाटन समारंभानंतर’ ‘गाव हा विश्वाचा नकाशा ‘ या महत्त्वाच्या परिसंवादात डॉ. श्रावण बाणासुरे (बल्लारपूर), डॉ.मोहन कापगते (ब्रम्हपुरी), अरुण झगडकर ,पंढरीनाथ चंदनखेडे (पुणे) एड. सारिका जेणेकर (राजुरा) , श्रीकांत धोटे (गडचिरोली) यांनी समयोचित विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे होते. सायंकाळच्या सत्रात सामुदायिक प्रार्थनेवर जहीर खान यांनी विचार व्यक्त केले. तर पहिल्या प्रबोधनपर भागात सुधाकर गेडेकर ,अनुराग मुळे, मुरलीधर चुनारकर, चेतन ठाकरे यांनी जनप्रबोधनपर एकपात्री प्रयोग सादर करून मनोरंजनातून प्रबोधन केले. त्यानंतर सप्तखंजेरीवादक उदयपाल वणीकर यांचा खंजेरी वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. संमेलनाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष सुप्रसिध्द विनोदभाऊ देशमुख यांनी केले. परिषदेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार ना. मुनगंटीवार आणि संमेलनाध्यक्ष डॉ . कोकोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. रघुनाथ कडवे यांच्या राष्ट्रसंताची अभंगगाथा (इंग्रजी भाषांतर), सौ. प्रिती जगझाप यांच्या बालगीतांचा खजिना काव्यसंग्रह, सौ. स्मिता बांडगे यांचा आत्मभरारी , विलास दशमुखे संपादित राष्ट्रसंत साहित्य पुरवणी, डोमाजी कापगते यांच्या जनसेवक आदी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. नामदेव कोकोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून आदर्श राजगडचे चंदू पाटील मारकवार , समाज कल्याण विभाग उपायुक्त विजय वाकुलकर , ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, श्रीकांत धोटे , भाऊराव पत्रे, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख , अरूण झगडकर उपस्थित होते.याप्रसंगी चंदू पाटील मारकवार म्हणाले, केवळ भाषणाने समाजात बदल होऊ शकत नाही तर राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या विचारांवर कृती केल्यास बदल होईल. त्याकरता स्वतःमधला अहंकार दूर करून गावासाठी झटले पाहिजे. त्यामुळे विचारांची शुद्धी होते आणि आत्मबळ वाढते असे मत त्यांनी व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष डॉ. कोकोडे याप्रसंगी म्हणाले, आता परिस्थितीत बदल होत आहे .शहरी राहणारे लोक आता विकसित खेडे पाहायला येत आहे. त्यामुळे ग्रामगीतेतील अध्यात्म आणि विज्ञान या विचाराने समर्पण भावनेने काम केल्यास समाजामध्ये नवीन नवचैतन्य निर्माण होईल, यातून विश्वसेवेचे काम होईल. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने पूज्य तुकाराम दादांनी ज्ञानाची धरोवर असलेली अड्याळ टेकडी निर्माण केली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते घडले असे ते म्हणाले. विजय वाकुलकर आणि भाऊ पत्रे यांनी संमेलन समितीचे कौतुक करून अशी संमेलने गावोगावी झाली पाहिजे, असा विचार मांडला. तर एड. कटरे म्हणाले की , राष्ट्रसंतांची ग्रामगीता ही दुसरे संविधान आहे. गावे घडण्यासाठी या ग्रंथाचे वाचन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.
———————
तीन ठराव सर्वानुमते मंजूर
————–
या संमेलनात सर्वानुमते तीन ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.ठरावाचे वाचन अरूण झगडकर यांनी केले.
१. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सरकारने प्रदान करण्यात यावा.
२. गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत अध्यासनाला शासनाने मान्यता देऊन राष्ट्रसंतांच्या साहित्याचा समावेश विद्यापीठाच्या पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्यात यावा.
३.जिल्हातील प्रत्येक गावी सामुदायिक प्रार्थना व सांस्कृतिक भवन शासनाने निर्माण करणे
—————————

‌ संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आलेल्या प्रतिनिधींनी सकाळी श्रमदान, स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. त्यानंतर सामुदायिक ध्यानावर खेमदेव कन्नमवार यांनी चिंतन प्रस्तुत केले. योग प्राणायामवर विनायक साळवे यांनी मार्गदर्शन केले. सकाळचे अनुभव कथन परिसंवाद सेवकदास खुणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्राचार्य सौ.रत्नमाला भोयर यांच्या अध्यक्षतेत धनंजय साळवे आणि विनायक धानोरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. संमेलनाचे आयोजन मराठा युवक मंडळ व जनहिताय युवक मंडळ तसेच सर्व स्थानिक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमात विशिष्ट सेवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.संमेलनाचे आयोजन ग्रामस्थांना नवी उर्जा देऊन गेले असे मत स्वागताध्यक्ष सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ देशमुख यांनी व्यक्त केले. सर्व ग्रामस्थांनी उत्तम नियोजन केले होते.