✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.17फेब्रुवारी):-शहरातील संजय नगर भागातील एक तरूण गोंविदवाडी तलावाजवळील दर्गामध्ये पाया पडण्यासाठी गेला होता. हातपाय धुताना त्यांचा तोल सुटल्याने तलावात पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमर अजिस शेख ( वय ,२६ वर्ष ) राहणार संजय नगर गेवराई असे तलावात बुडुन मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो गुरूवारी (दि. १६ ) दुपारी ३ च्या सुमारास गेवराई शहरालगत असणा-या गोंविदवाडी तलावाच्या शिवारातील दर्ग्याला पाया पडण्यासाठी गेला होता. पाय धुत असतांना त्याचा तोल गेला आणि हा युवक पाण्यात बुडाला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला बाहेर काढुन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
गेवराई पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असुन या प्रकरणी उशिरा पर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, साजेद सिद्दीकी उपस्थित होते. या घटनेची माहिती समजताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. संजय नगर भागात या तरुणाच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अमर शेख याच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.