चार दिवसांपासून मनपाचा पाणी पुरवठा बंद-चंद्रपुरातील नागरिक करीत आहे भिषण पाणी समस्येचा सामना

29

🔹येत्या उन्हाळाभर तडफावे लागण्याची भिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11मे):– चंद्रपूर शहरात एकीकडे तापमानाचा पारा चाळीशीच्या पार कडक उन तापत असल्याने नागरिकांच्या जिवाची काहीली होत असताना दुसरीकडे विजेचा लंपडाव एक एक तास वीज पुरवठा खंडीत करुन नागरिकांची अग्नीपरिक्षा घेतली जात असताना महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना हि शिक्षा कमी पडते की काय म्हणून गेल्या चार दिवसांपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. अशा प्रकारे कडक उन, वीज पुरवठा ठप्प अन पाणी पुरवठाही ठप्प अशा परिस्थीतीत चंद्रपूर शहरातील जनतेला एक प्रकारे काळ्या पाण्याची शिक्षेत जगण्यास प्रशासन भाग पाडत आहे.

तुकूम येथील मनपा शाळेच्या मागील भागात तब्बल चार दिवसांपासून नळाचा पाणी पुरवठा बंद आहे. या भागात पाण्याचे एकमेव साधन नळ असल्याने येथील नागरिकांना भिषण पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी पाण्याचे व्हाल्व सोडणारा कर्मचारी नागेश मेश्राम ते मनपा पाणी पुरवठा अभियंता भानारकर, अभियंता बोरीकर व अखेर थेट मनपा आयुक्त पालीवाल यांना चार दिवसापासून नळ येत नसल्याची तक्रार केली मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. सगळ्यांनी दहा वाजता, कोणी साडेअकराची वेळ तर कोणी बाराची वेळ देत आपली सुटका करुन घेतली शेवटी तुकूम वासीयांच्या हाती निराशा आली आहे.

तुकूम भागातील नागरिकांना दोन दिवस पुरेल इतके पाणी होते आता पाण्याविना करायचे काय अशा स्थीतीत सर्व कामकाज ठप्प पडले आहे. बाकीच्या कामासाठी तर सोडा पिण्यासाठी पाणी नसल्याने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली आहे. पाण्याच्या टाकी पूर्णपणे भरल्या जात नाही यामुळे एक दिवसाआड अन तेही केवळ एक तास पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रपुरात भिषण पाणी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये अमृत योजनेवर खर्च केले ते गेले कुठे असा प्रश्न जनतेला पडला आहे. अमृतच्या उद्घाटनाच्या वेळेस चमकोगीरी करणारे महापौर, उपमहापौर आता कुठे लपले आहे असा प्रश्न पाणी समस्येने त्रस्त जनता करीत आहे. गेल्या चार दिवसापासून बंद असलेल्या पाणी पुरवठा वरुन येत्या कडक उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी मनपा प्रशासन चांगलेच तडफवणार आहे अशी भिती चंद्रपुरातील लाखो रहिवाशांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.