बौद्ध साहित्तीकांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी-जयसिंग वाघ

31

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.1जुलै):- भारतातील बौध्द साहित्तीक प्रदीर्घ कालखंडानंतर प्रामुख्याने १९५६ नंतरच उदयास आले असल्याने त्यांचा वैचारिक पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहे. याच काळात दलित वा आंबेडकरी समाजात विविध विचारधारेवर संशोधनात्मक लिखाण करणारे साहित्तीक उदयास आले. या सर्व साहित्तिकांनी अन्य कोणत्याही साहित्य मंचावर जातांना आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .

बौद्ध साहित्य परिषद तर्फे डिसेंबर २०२३ मध्ये अमळनेर येथे होणाऱ्या अ.भा.मराठी साहित्य संमेलन व विद्रोही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमिवर बौद्ध साहित्तीकांची भूमिका या विषयावर ऑन लाइन घेतलेल्या चर्चासत्रात वाघ बोलत होते. बौद्ध साहित्य प्रचार संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. शुक्राचार्य गायकवाड़ अध्यक्षस्थानी तर मुख्य मार्गदर्शक प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. यशवंत मनोहर होते. चर्चासत्रात वाघ यांच्यासह मैक्स महाराष्ट्र चे किरण सोनवणे व परिषदेच्या उपसमितिचे प्रदेश उपाध्यक्ष भटू जगदेव यांचा सहभाग होता.

सुरवातीस संस्थेचे सचिव प्रा. भरत शिरसाठ यांनी भूमिका विषद करुन आज बरेच बौद्ध साहित्तीक भरकटत आहेत,आपले आदर्श, आपली विचारधारा याचे भान न ठेवता ते लेखन करतात व बोलत असतात तेंव्हा बौद्ध साहित्य परिषदेच्या लेखकांचे प्रबोधन व्हावे व त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट राहावी या करीता या चर्चासत्राचे आयोजन केले आहे .

प्रख्यात विचारवंत यशवंत मनोहर यांनी अ.भा.मराठी साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन यातील वैचारिक व मूलभूत फरक विस्तृतपणे विशद करुन आपण विद्रोहाचे वाहक आहोत, बुद्ध हे जगातील पहिले विद्रोही आहेत तोच वारसा पुढं बाबासाहेबांनी चालवून तो आपल्याला दिला आहे.प्रा. डॉ. शुक्राचार्य गायकवाड़ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आताचे बदलते साहित्यविश्व, बदलती सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिति आपल्या साहित्याचा विषय जरूर असावा पण आपले मुळआदर्श विसरता कामा नये.या चर्चेत अशोक बिरहाड़े , प्रा. डॉ. राहुल निकम, अजय भामरे यांनी सुद्धा आपले विचार मांडले. अखेरिस प्रा. भरत शिरसाठ यांनी आभार व्यक्त केले.