हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगभूमीवर साकारले क्रांतियुद्ध.- प्रेक्षक झाले तल्लीन

125

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.6सप्टेंबर):-गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचं रान करुन वयाच्या २५व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची, आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडचिरोली येथे दि.३ सप्टेंबर २०२३ला निःशुल्क सादर करण्यात आला. रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे या प्रयोगाला दाद दिली.

झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून, प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने त्यांच्या लोकजागृती संस्था, चंद्रपूरच्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे. जिथे बंदुकीच्या जोरावर दाबून टाकण्यात आला सन १८५७चा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा उठाव, तिथे म्हणूनच जन्मास आला सन १८५७चा आदिवासींचा सशस्त्र क्रांतीचा उठाव आणि या उठावाचं पहिलं क्रांतिस्थळ होतं गडचिरोली जिल्ह्यातील मोलमपल्ली जमीनदारी. त्यात पहिले आद्य क्रांतिकारक होते “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके”. या क्रांतिविराची गाथा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर करण्यात कलावंत यशस्वी ठरले.

या नाटकाचे उद्घाटन डॉ.अनिल हिरेखन कुलसचिव यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ.देवराव होळी आमदार, डॉ.नामदेव उसेंडी माजी आमदार, मा. शिवप्रसाद गौड अतिथी प्राध्यापक, राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली, डॉ.सचिन मडावी सहा.आयुक्त सामाजिक न्याय विभाग, डॉ.राम मेश्राम माजी नगराध्यक्ष, मा.माधव गावड अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन, वसंत कुलसंगे, मारोतराव ईचोडकर, माजी सभापती, डॉ.शेखर डोंगरे झाडीपट्टी कलावंत व सामाजिक कार्यकर्ते मुनिश्वर बोरकर इ.मान्यवर उपस्थित होते.

नाट्य प्रशिक्षण शाळेतील ३५ कलावंतांनी हे उत्कृष्ट नाटक सादर केले असून “हे नाटक गडचिरोली जिल्ह्याचे भूषण आहे” असे गौरवोद्गार डॉ.नामदेव उसेंडी यांनी या प्रसंगी काढले. तर या नाटकाचे प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे” असे मत डॉ.देवराव होळी यांनी काढले. संगीता टिपले कार्यशाळा संचालक व अनिरुद्ध वनकर कार्यशाळा समन्वयक यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. अशी माहिती आमच्या प्रेस ऑफिसला श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींनी कळवली आहे.