आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषीच्या प्रतिभेला तोड नाही – कवी डॉ.धनराज खानोरकर

206

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30ऑक्टोबर):-“आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर रामायण सारखा अजरामर महाकाव्य निर्माण करून रामायणातील रामाच्या कीर्तीची पतंग उडविली तर रावणाला अपयशी दाखवले.संपूर्ण रामायणातील चिकित्सा केली असता कधी-कधी रावणसुद्धा महात्मा ठरतो,तर रामाच्या मर्यादा अधोरेखीत होतात.याला कारण महर्षी वाल्मिक ऋषींची काव्य प्रतिभा आहे.त्यांच्या काव्यप्रतिभेला तोड नाही ” असे प्रतिपादन नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकरांनी केले.ते ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील ढिवर समाजाच्यावतीन आयोजित महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवप्रित्यर्थ प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

विचारपीठावर सतीश ठेंगरे,प्रा.मंगेश देवढगले,प्रभुजी वाघधरे,अमरदीप लोखंडे,प्रा. प्रशांत राऊत,जितेंद्र कऱ्हाडे उपसरपंच अर्हेर नवरगाव,गोवर्धन बागडे इ.मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलतांना डॉ खानोरकर म्हणाले की, यशाचे शिखर गाठायचे असेल तर शिक्षणाची कास धरणे गरजेचे आहे. शिक्षणाशिवाय आपला व समाजाचा सर्वांगीण विकास साधने अशक्य आहे.आजवर झालेल्या अनेक महापुरुषांनी ज्ञानाच्या व शिक्षणाच्या जोरावर जगाचा कल्याण केला आहे याची साक्ष आजही इतिहास देत आहे.

यावेळी प्रा. मंगेश देवढंगले यांनी ‘रत्नाकर’चा महर्षी वाल्मिकी कसा झाला यावर प्रकाश टाकला तर वाघधरे यांनी समाजाला दिशा देण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आव्हान केले. अमरदीप लोखंडे यांनी समाजाने शैक्षणिक पात्रता वाढवून विकास साधण्यावर भाष्य केले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक नथुजी चांदेकर यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक,संचालन व आभार प्रा. मंगेश जारते यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीचे सदस्य व ढिवर समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.