अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन!

64

[आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती तथा मराठी पत्रकार- पत्रकारिता दिन विशेष]

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले. त्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे स्मरणपर्व या हेतुने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार तथा पत्रकारिता दिन म्हणून महाराष्ट्रभर साजरा केला जातो. नवीन जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाद्वारे रुजवून त्यांनी या परंपरेचा पाया घातला. त्या निमित्ताने हा विशेष लेख अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या त्रोटक शब्दांत…

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी दि.६ जानेवारी १८१२ रोजी बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला. अज्ञान, दारिद्र्य आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी ते मुंबईत आले. तेथे बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुद्धिचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३०मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. त्यांनी आता ग्रंथरचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी जन्मदिनी दि.६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या पत्राची मुहूर्तमेढ रोवली. सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात केले. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी! ती महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी केली. प्रयत्नशील व वैचारिक चळवळ सुरू केली. त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृद्धी हेच आपले जीवनकार्य मानले.

मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी घातला. त्यांनी अल्पावधित महाराष्ट्राच्या जीवनावर विलक्षण छाप टाकली. त्यांनी राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजाचा विकास केला. त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे प्रवर्तक म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून ‘दर्पण’ वृत्तपत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे. दर्पण हे वृत्तपत्र सन १८३२मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. त्यांनीच सन १८४०मध्ये दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक काढले. त्यांचा लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हाच हेतू, या उपक्रमांमागे होता.

सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी महाराष्ट्रात केले. मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसारखी विलक्षण कामगिरी बजावणारे ते त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन १८३४मध्ये भारतातील पहिले प्राध्यापक- प्रोफेसर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन १८४५मध्ये राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन व विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृद्धी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले. प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते, असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली.

सामाजिक प्रबोधनात वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही, हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली. राजाराम मोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे ते प्रभावित झाले. त्यांनी नव्या पत्राचा संकल्प करून तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ त्यांनी गिरविला आणि त्यातून महाराष्ट्रात नवीन लोकचळवळ उभारली. गंगा-यमुना द्वैभाषिक पत्र ही परंपरा बंगालतून महाराष्ट्रात पुढे आली.

आचार्य बाळशास्त्रीं जांभेकर यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी व विदेशी ९ भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास व संस्कृती, गणित, पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविद्या इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली. त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते व त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या.सर टी.ई.पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे.डॉ.विल्सन व न्या.चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी त्यांच्या लोकाभिमुख विद्वत्‍तेचा गौरव केला होता. आज बर्‍याच ठिकाणी पत्रकार बांधवाच्या वतीने उत्कृष्ट साहित्यिक, लेखक, कवी, समाजसेवक आदींना दर्पणकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येऊ लागले आहे. समाजानेही पत्रकार बांधव वृत्तसंकलनरुपात करीत असलेली अविरत- अहर्निश सेवा व न्यायदानाची धडपड लक्षात घेऊन यथोचित त्यांचाही दर्पणकार पुरस्काराने गौरव केला पाहिजे, असे जाहीरपणे सुचवावेसे वाटते.

भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे, की ते पश्चिम भारत खंडातील अर्वाचीन विद्वान मुकुटमणी, प्रख्यात पं.अद्वितीय विद्वान होते. मुंबईना समाचार या गुजराथी पत्राने या शिक्षण महर्षींची स्मृती भारतीयांनी सतत जागृत ठेवावी, असे आवाहनही केले होते. दि.१७ मे १८४६ रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा कायापालट करणारे ठरले, हेच खरे!

!! अशा या थोर आद्य पत्रकारास लाख लाख विनम्र अभिवादन !!

✒️श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरूजी(मराठी व हिंदी साहित्यकार)मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.ता. जि. गडचिरोली (विदर्भ नागपूर)व्हा. नं. ९४२३७१४८८३
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com