पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू – जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे

68

✒️अतुल बडे(विशेष प्रतिनिधी)

मो:-9096040405

बीड(दि.17ऑक्टोबर):- ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.

जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालु खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, सोयाबीन, बाजरी आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला. कापसाच्या वाती झाल्या.

सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे हाल पहावेत अशी मागणी करतानाच तात्काळ मदत भेटली नाही तर माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.