कष्टकरी पद्मशीलाच्या जिद्दिला सलाम

73

‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा !’ या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्याची प्रचीती दिलीय ती नाशिक येथील पद्मशीला तिरपुडे या विद्यार्थिनीने. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असली तरी जिद्द अन्‌ शिक्षकांनी लढण्यासाठी दिलेल्या पाठबळाच्या जोरावर पद्मशीलाने यश मिळविले आहे. ध्येय जर प्रबळ असेल, तर यश आपोआप आपल्या पायाजवळ चालत येते, याचा उत्तम नमुना अनुभवण्यास मिळाला.

गोदावरी काठच्या पालात दोन लहानग्यांसह चाललेला संसार… पतीचे मोल मजुरीचे काम ….. घरात अठरा विश्‍व दारिद्य्र …… अशा अनेक आव्हानांशी लढत तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले अन केवळ एवढ्यावरच न थांबता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क फौजदारही झाली … ही गोष्ट आहे सामान्यांतील असामान्य पद्मशीलाची …! सर्वसामान्य कुटुंबातील बेताची आर्थिक परिस्थिती आणि अनंत अडचणींशी संघर्ष करत पद्मशीला तिरपुडे यांनी मिळविलेले यश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत असेच आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमीत अलीकडेच पार पडलेल्या फौजदारांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा पद्मशीलाच्या जीवनातील आनंदाचा आणि अभिमानाचा ठेवा ठरला. हा क्षण अनुभवण्यासाठी तिने केलेल्या प्रचंड संघर्षाची ही एक सुखद परिणती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भंडारा जिल्ह्यातील वाळकेश्‍वर जवळच्या पहेला गावातल्या श्री. पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी पद्मशीला रमेश तिरपुडे हिचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही पद्मशीला तीरपुडे यांनी पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. दोन बाय चारच्या खोलीत राहून त्यांनी आपला सुखी संसार सांभाळत पद्मशीला आज या ठिकाणी पोहोचल्या आहेत. या प्रवासात त्यांना त्यांचे पती पवन खोब्रागडे यांची मोलाची साथ मिळाली आहे. मनात एखादी गोष्ट आणली तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती सिद्ध करु शकतो, याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे.

पद्मशीला यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पवनने अक्षरशः जीवाचं रान केले. लहान मुलांना सांभाळणं, खाऊ-पिऊ घालणं सगळी कामं पवन स्वत: करीत. दहा बाय दहा आकाराचे घर स्टडी रुम झाले होते. कॉटखाली, कॉटवर सगळीकडे पुस्तकेच पुस्तके. या पुस्तकांनीच दोघांचं आयुष्य बदललं. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. कदाचित ते खरं असावं नाहीतर आयुष्यात इतकी मोठी किंमत मोजूनही झगडा देण्याचं बळ क्वचित कोणाच्या हातांना येईल.

विवाहानंतर दोघांनीही गाव सोडले आणि थेट औरंगाबाद गाठले. तिथे रोजंदारीवर मिळेल ते काम करण्यासाठी भटकंती सुरु झाली मात्र बराच काळ ओलांडला तरी काही केल्या काम मिळेना. अखेर एका कंपनीत रोजंदारीवर मिळेल ते काम करू लागले. अशातच कंत्राटी कामही काही कारणास्तव सोडावे लागले अन मग समोसे विक्रीचा व्यवसाय करू लागले. प्रसंगी गहू तांदळाचे पोते उचलून बराच काळ हमालीही केली. पण काही केल्या संसाराचा गाडा रुळावर येईना. ऊन, वारा, पाऊस असो की थंडी कशाचीही पर्वा न करता काबाडकष्ठ करूनही यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर दोघांनीही नाशिक गाठले. गोदावरी नदीच्या कडेला पाल ठोकून मजुरीवर गुजराण करणाऱ्यांनी आसरा देऊन दिलासाही दिला अन यातच आशेचा किरण दिसू लागला. काही दिवसांतच पती पवन यांनी पेव्हर ब्लॉक काम सुरु केले आणि या व्यवसायात हळूहळू यश मिळवत पवन तरबेज झाले.

‘मुक्त’ शिक्षणाने मिळाली आयुष्याला दिशा

घर-संसार, काम करता-करता शिक्षण घेण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत उपलब्ध झाल्याने, आज माझे पोलिस अधिकारी व्हायचं स्वप्न पूर्ण झाले याचा आनंद आहे. या प्रवासात माझ्या पतीची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी माझ्यासाठी खूपकाही सोसलंय. हमाली केली. सामोसे विकले. मजुरी केली. त्यांनी त्या वेळी घेतलेले कष्टच आज कामाला आले.
– पद्मशीला तिरपुडे (पोलिस उपनिरीक्षक)

शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे हे लक्षात आल्यानंतर शिक्षण घेऊन पुढे काही तरी केले पाहिजे, ही ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मुलांचा सांभाळ, पतीला मदत आणि अभ्यास या सर्वांना वेळ देणे म्हणजे तारेवरची कसरत होती; मात्र हे आव्हान पद्मशीला यांनी स्वीकारले. दोघांनीही मोल मजुरी करता-करता शिक्षण घेण्याचा निर्धार केला. वेळ मिळेल तसे त्यांनी अभ्यास केला आणि अखेर परिश्रमाला फळ आले.

पद्मशीलाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. व्यवसायात पतीला मदत करतानाच संसाराचा गाडा ओढत, घरातील सर्व कामे सांभाळत बी.ए. चे पदवी शिक्षण पूर्ण केले. दरम्यान याच काळात त्यांना प्रांजल आणि प्रज्वल ही दोन आपत्येही झाली. दोन मुलांना सांभाळताना ‘एमपीएससी’च्या अभ्यासावरही पद्मशीलाने आपले लक्ष केंद्रित केले आणि कसून अभ्यास सुरु ठेवला. गेल्यावेळी अवघ्या एका गुणाच्या फरकाने त्यांची संधी हुकली. परंतु या अपयशाने हताश न होता पुन्हा तहान, भूक विसरून जिद्दीने अभ्यास केला अन पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. बेताची परिस्थिती असल्याने मदतीचे अनेक हात पुढे आले. सुकामेवा, सकस धान्याची मदत आणि आत्मविश्वासाचे बळ मिळाल्याने. अखेरीस शारीरिक चाचणीतही यश मिळाले अन प्रशिक्षणासाठी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत दाखल झाल्या. सध्या त्या अमरावती येथे कार्यरत आहेत.

तब्बल दहा वर्षे सोसलेल्या वेदना, समाजाने दिलेला आधार, मायेचा हात, आत्मविश्वास, अन काही झाले तरी पत्नीला वेळोवेळी पाठबळ देणारे पती पवन यांचे पाठबळ हा प्रचंड अनुभव त्यांना शांत बसू देत नव्हता. अखेर पद्मशीलाने अठरा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि केवळ शिक्षणामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे अर्धवट राहिलेले पद्मशीलाचे स्वप्न पूर्ण झाले. त्यांना आता पहिलेच पोस्टिंग अमरावतीला दिले आहे. जिज्ञासू वृत्ती, जिद्द, महत्त्वाकांक्षा असेल तर अशक्‍य काहीही नाही. असे त्या आज ठणकावून सांगतात. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फौजदार झालेल्या पद्मशीला तिरपुडेच्या संघर्षाची कहाणी वंचित समाजातील महिलांना दिशा आणि बळ देणारी आहे.

साभार – संतोष साबळे,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ