महसूल वसुलीवर शंभर टक्के भर द्या

74

🔸विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले महसूल अधिकाऱ्यांचे बैठकित निर्देश

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.14डिसेंबर):- विभागाला देण्यात आलेल्या महसूल वसुलीच्या उद्दीष्टात नाशिक जिल्ह्याचा सर्वात मोठा वाटा आहे. जिल्ह्याला जमीन महसुलीचे 86 कोटी 50 लाख तर गौण खनिजाचे 142 कोटी 50 लाख रुपयांचे वसुलीचे उद्दीष्टे देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी शंभर टक्के वसुली करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

श्री. गमे म्हणाले, नाशिक जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दीष्टांपैकी जमीन महसुलीचे उद्दीष्टे 28.48 टक्के तर गौण खनिजाचे 38.65 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरीत उद्दीष्ट्ये पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून महसूल वसुलीचे उद्दीष्ट्ये पूर्ण करावे. तसेच शासनाचा महसुलाची वसुली करणे हा उद्देश नसून अनधिकृपणे चालणाऱ्या कामांना आळा घालणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक प्रांत अधिकाऱ्याने व तहसीलदारांनी गौण खनिजाच्या अनधिकृतपणे होणाऱ्या उत्खननावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

पेठ व सुरगाणा तालुक्यात शासकीय किंवा खासगी जागांचा शोध घेऊन नवीन दखडखाणींचे नियोजन करावे. अनेक तालुक्यातील अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी प्रत्येकाने जागृकपणे काम करणे आवश्यक आहे. ईटीएस मशिनद्वारे मोजणी करून परवानगी पेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खणन झाल्याचे आढळल्यास त्या ठिकाणी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी संबंधितांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या.

अधिकृत आणि अनधिकृत खडीक्रशरची माहिती घेत असतांना श्री. गमे म्हणाले अनधिकृतपणे चालणारी खडी क्रशर बंद करुन वसुलीची कारवाई करण्यात यावी. तसेच मागील दहा वर्षातील प्रलंबित वसुलीच्या प्रकरणांवर कारवाई करुन प्रकरणे निकाली काढावेत, जेणेकरुन महसूल वाढीवर त्याचा चांगला परिणाम होईल. चलन प्रणालीचा वापर करुन 42 ब व 42 क च्या अनुषंगाने बिनशेती सनद वाटपाच्या कामाला गती देण्यासाठी चलन प्रणालीचा वापर करण्यात यावा, असेही गमे यांनी सांगितले.

सातबारा संगणकीकरणाचे काम चांगले
सातबारा संगणकीकरणामुळे रेकॉर्ड चांगल्याप्रकारे जतन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात सातबारा संगणकीकरणाचे काम समाधानकारक झाले असल्याने श्री. गमे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात अर्जदारांना नोटिसा किंवा सूचना व्हॉटस ॲपद्वारे पाठविण्यात याव्यात अशा सूचनाही श्री.गमे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

सामाजिक जाणिवेतून ‘उभारी’ उपक्रम यशस्वी करावा
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त 255 कुटुंबिय ‘उभारी’ कार्यक्रमातंर्गत पात्र झाली होती. सर्व कुंटुबियांचे सर्वेक्षण नाशिक जिल्ह्याने केले आहे. सर्वेक्षण केलेल्या 255 कुटुंबियांपैकी 136 कुटुंबियांना कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे दिसून येत असून त्यांनी मागणी केलेल्या योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना खासगी क्षेत्रात नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरुन खऱ्या अर्थाने ‘उभारी’ उपक्रम यशस्वी होइल, असे श्री. गमे यांनी सांगितले.

🔸नियोजनाच्या माध्यमातून महसूल वसूलीच्या कामाला गती देणार : सूरज मांढरे

प्रशासकीय कामकाज, महसूल वसुलीची कामाला गती देण्यासाठी जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या ठोस कामगिरीमुळे कोरोनो संसर्ग रोखण्यामध्ये प्रशासनाला यश आले आहे. राज्यात नाशिकचा मृत्युदर सर्वात कमी आहे. उभारी कार्यक्रमातंर्गत 255 कुंटुबियांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच शेती महामंडळाचे ई-प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सैनिकांच्या जमिनी वाटपाबाबत कार्यवाही सुरू असून, बैठकीत चर्चा झालेल्या सर्व मुद्द्यांवर गतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले