कृतज्ञता

80

आईवडिलांनी जन्म देऊन पायावर उभे केले यात त्यांनी काय विशेष केलं,ते त्यांचे कर्तव्यच होते,हे म्हणणाऱ्यांपाशी कृतज्ञतेचा एखादा अंश तरी कसा शिल्लक असेल?जीवनाच्या प्रवासात कोणी नोकरी लावून देतो,कोणी शाळेत डोनेशनशिवाय प्रवेश मिळवून देतो,कोणी उसने पैसे देतो,कोणी ओळखीच्यांना सांगून घर भाड्याने मिळवून देतो,कोणी उत्तम सल्ला देतो,कोणी मानसिक आधार देतो,कोणी लग्न जमविण्यासाठी निःस्वार्थीपणे खटाटोप करतो,कोणी यापैकी काहीच न करता स्वतःच्या व्यवसायात नीतीमत्तेची जपणूक करून समाजाच्या खिशातल्या पैशांची बचत करतो,कोणी झाडे लावतो,कोणी मोफत दवाखाने चालवतो,कोणी पाणपोयी काढतो,कोणी यथाशक्ती अन्नदान करतो,या साऱ्या गोष्टींविषयीची कृतज्ञता माणूस या नात्याने आपल्या मनात निर्माण होते का,याची चाचपणी प्रत्येकाने करावयास हवी.आई-वडील,भाऊ-बहीण,गुरुजी,शेजारी-पाजारी,सहकारी-मित्र,नातलग,ओळखी-अनोळखी असे भोवतीचे सारे लोक आपल्यावर कळत नकळत उपकार करीत असतात.

त्यांची अपेक्षा असो वा नसो,त्यांच्याविषयीची कृतज्ञता आपल्या मनात जागृत झाली,की पुढचं सारं आयुष्य ‘कृतघ्न’ या शब्दाशिवाय पूर्णत्वास जाईल.तेंव्हा जीवनात ज्यांनी ज्यांनी आपल्याला बहुमोल असे उपकार,सहकार्य केले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.कृतज्ञ आणि कृतघ्न हे दोन शब्द अगदी चौथी-पाचवीपासूनच मराठीच्या पाठ्यपुस्तकाच्या तळाशी असणाऱ्या शब्दसंग्रहामुळे जवळपास प्रत्येकालाच परिचित होतात.या दोन्ही शब्दांतील परस्परविरोध वयाच्या वर्षांची उंची काहीशी वाढल्याशिवाय बऱ्याचदा लक्षात येत नाही.उच्चारायला काहीसे अवघड,लिहिण्यासाठी त्या वयात जिकिरीचे आणि मुख्य म्हणजे पहिल्यासाठी दुसरा आणि दुसऱ्यासाठी पहिला वापरण्याची गफलत होण्याची मोठी शक्यता.त्यामुळे भाषा समजून देणाऱ्या पुस्तकात शब्दांच्या वर्गवारीचा ऊहापोह करतांना विरोधी शब्दांचे अर्थ ज्यावेळी उलगडून सांगितले जातात,त्यावेळी उपकारकर्त्यांची जाण ठेवणारा तो कृतज्ञ आणि न ठेवणारा तो कृतघ्न असा अर्थ कळला,तरीही त्यातील चांगल्या अर्थाचा स्वीकार कृतीच्या अंगाने करायलाच हवा असे बंधन कोणी लिखित स्वरूपाचे घातलेले नाही.

त्यामुळे अशा प्रकारे मिळणारी सूट सोयिस्कर रीत्या ‘स्वतःसाठी’ कशी अकटोविकटीने वापरता येईल याचा विचार होऊ लागतो आणि ‘स्वतःसाठी’ या शब्दाच्या मोहात एवढे अडकायला होते की,‘कृतज्ञ’ या शब्दाचा जवळजवळ विसरच पडतो.विश्वाच्या पसाऱ्यात अगणित स्वरूपात वावरत असणाऱ्या जीवजंतूंमध्ये एका माणसाचे स्थान महत्त्वाचे असतेही आणि नसतेही.पण हाच माणूस त्याच्या कुटुंबात मात्र अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून वावरत असतो.कुटुंब-संसार-परिवार यामध्ये असणारे सारेच लोक एकमेकांशी नात्याच्या घट्ट विणेत गुंतलेले असतात.खरं तर हीच श्रृंखला घराबाहेर पडले,की अधिक विस्तारते.या विस्ताराला आपण समाज म्हणतो.माणसाचा एक पाय कुटुंबात असतो,तेव्हा दुसरा समाजात असतो.कुटुंब आणि समाज यांच्यासोबत समांतरपणे प्रत्येक व्यक्तीचा प्रवास सुरू असतो.या प्रवासात असंख्य व्यक्तींचे कळत नकळत माणसावर उपकार होत असतात.मदतीचा हात हातात घेतल्याशिवाय बऱ्याचदा पुढे सरकता येत नाही आणि याच उपकाराची जाण ठेवणाऱ्याला कृतज्ञ म्हटलं जातं.

मात्र नेमकं काळाचं आणि माणसाचं गणित कुठे चुकलंय ठावूक नाही,पण माणसाने दाखवायला हवा तो कृतज्ञता भावच माणूस हरवून बसलाय.सूर्याचा प्रकाश,वातावरणातली हवा,ढगातले पाणी,धरतीमधली नवसृजनाची शक्ती या साऱ्या गोष्टी ज्याने त्याने द्यायच्या नाकारल्या तर काय होईल? पूर्णपणे फुकट,मुबलक आणि निरपेक्ष अशा पध्दतीने ज्यांच्याकडून हे सारं अमोलीक किंमतीचे धन प्राप्त होते,त्यांच्याविषयी अपरंपार कृतज्ञता भाव प्रत्येकाच्या मनात असावयास हवा,पण तो असतो का?
प्रत्येकाने आयुष्यात कृतज्ञ राहिलेच पाहिजे.कृतज्ञता ही जशी आपल्याला मदत करणा-या इतरांबद्दल असावी,तशीच ती देवाबद्दल असावी.आपल्याला मिळालेल्या संधींबद्दल आणि हो आव्हानाबद्दल व अपयशाबद्दल देखील असावी.कृतज्ञता ही फक्त काही भव्य-दिव्य मिळाले,तरच व्यक्त करावी का? तर बिलकूल नाही.आपल्याला ज्या गोष्टी क्षुल्लक वाटतात,त्या इतरांसाठी आयुष्यातील मोठे स्वप्न असते.त्यामुळेच ज्याच्याकडे पायात घालायला ब्रँडेड शूज नाहीत,त्याने ज्याचे शूज फाटके आहेत त्याच्याकडे पाहून देवाकडे कृतज्ञता व्यक्त करावी.ज्याच्याकडे फाटके बूट आहेत,त्याने अनवाणी माणसाकडे पाहून स्वत:ला भाग्यवान समजावे आणि जो अनवाणी आहे,त्याने पायाने दिव्यांग असणाऱ्याकडे पाहून स्वत:ला भाग्यवान समजावे.याचाच अर्थ काय,तर प्रत्येक व्यक्तीला ईश्वराने कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिलेली असते.अपयश या शब्दाची फोड अ म्हणजे अथक,प म्हणजे परिश्रम;अथक परिश्रमाने मिळविलेले यश अशी केल्यास,अपयशाबद्दल कृतज्ञता सहज व्यक्त केली जाऊ शकते.तसेच अपयशामुळे काही जण दुस-या क्षेत्राकडे वळायला प्रवृत्त होतात व तिथेच यशाच्या शिखरावर पोहोचतात.

आपल्यावर ज्यांनी उपकार केले,त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण देखील इतरांना मदत करावी,जे आपल्याला मिळाले,ते आपण दुस-यांना हस्तांतरित करावे.ज्योत से ज्योत जलाते रहो,या न्यायाने दुस-यांचे उपकार स्वीकारा व दुस-यांना उपकृत करा.मुख्य मुद्दा आपण विसरू नये व तो म्हणजे आपण मनात अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो,पण त्याची जाहीर वाच्यता करण्यास संकोचतो.असे करू नका.इतरांसमोर त्याचे आवर्जून आभार माना,ज्याने आपल्याला उपकृत केले आहे.कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे आपल्या वैयक्तिक व प्रोफेशनल लाईफमध्ये आपण आदरास पात्र ठरतो,लोकांबद्दल आदर व्यक्त केल्याने लोकांच्या मनात आपल्याबद्दल कृतघ्न,संधीसाधू अशी आपली प्रतिमा कधीच तयार होत नाही,आपण इतरांना उपकृत केल्याने असे लोक आपले चाहते व पाठीराखे बनतात.जो कृतज्ञ असतो,त्यालाच भविष्यात अनेक लोक मदत करायला पुढे येत असतात.कृतज्ञता व्यक्त केल्याने आपण नेहमी सकारात्मक व आनंदी राहतो तेव्हा उपकृत व्हा,उपकृत करा…!!!

कृतज्ञता म्हणजे लोकांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवून जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा त्याची परतफेड करणे किंवा आभार मानणे.थॅंक यू किंवा आभारी आहे हे शब्द कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.कृतघ्नता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण व सत्कृत्य विसरून जाणे,त्याची परतफेड न करणे व उपकारकर्त्याचेच वाईट चिंतणे,म्हणजेच काय तर “गरज सरो आणि वैद्य मरो”.उपकारकर्त्याची जाण ठेवणारा तो कृतज्ञ आणि न ठेवणारा तो कृतघ्न.खरतर,आपल्या जीवनात कृतज्ञता व्यक्त करणार्‍या लोकांपेक्षा कृतघ्नता व्यक्त करणारे लोक जास्त असतात.आचार्य अत्रे यांचे वाक्य आहे,ते म्हणतात, “उद्या माझी समाधी बांधायची झाली,तर तिच्यावर एकच वाक्य लिहून ठेवा की हा माणूस मूर्ख असेल,अविचारी असेल,मात्र कृतघ्न हा कधीच नव्हता”.कृतज्ञतेचा एवढा महान महिमा आचार्य अत्रे यांनी आपल्या ठायी जपलेला होता.कृतज्ञता ही भावना नसून मनाची अशी अवस्था आहे,ज्या मध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड साठा आहे.या जगात चांगुलपणा आहे तो कृतज्ञतेमुळेच! कृतज्ञता व्यक्त करणारे लोक नेहमी आनंदी असतात.ते जास्त आशावादी,उत्साही,निश्चयी असतात इतकंच नाही तर त्यांचं एकूण मानसिक आरोग्यही उच्च प्रतीचं असतं.

कृतज्ञता बाळगली की सकारत्मकता वाढते.समस्यांना तोंड देतांना मन सकारात्मक असेल तर विधायक उपाय सुचतात.कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे किती तरी नकारात्मक विचारांवर-भावनांवर सहज मात करता येते.जीवन जगत असतांना पदोपदी आपल्याला इतरांची मदत मिळत असते.त्यामुळे कृतज्ञता हा आपला अंतर्भूत गुण व्हायला पाहिजे.जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला इतरांची मदत मिळत असते जसे की बालपणी आईवडील, विद्यार्थीदशेत शिक्षक,तरुणपणी पतिपत्नी,मित्रमंडळ,म्हातारपणी आपली मुलेबाळे,समाज तसेच आपल्याला सदैव मदत करणारा निसर्ग यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच तर आपण आपले संपूर्ण आयुष्य यशस्वीपणे जगत असतो.ज्या सृष्टीने,निसर्गाने,ईश्वराने आपल्याला जन्म देऊन पालन पोषण केले त्याच्याप्रती अर्पणभाव.कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे.

कधीकधी भुकेच्यावेळी आपल्या टिफीनमधून दोन घास आपल्याला कोणीतरी खायला देतो,बसमधील गर्दीत आपण स्वत: उभे राहून आपल्याला बसायला जागा
देते,मोलकरीण कपडे धुवून देते,पत्नी तुमच्यासाठी स्वयंपाक करते,तब्येत बिघडली की डॉक्टर उपचार
करतात व परिचारिका रुग्णांची शुश्रूषा करतात,देशाचे जवान अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे संरक्षण करतात त्यामुळे आपण सुरक्षित राहतो असे कितीतरी उदाहरण आपल्याला देता येईल जिथे आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे.आयुष्यातल्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणावर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांचे विस्मरण होणार नाही याची खबरदारी आपण सदैव घेतली पाहिजे.रोज रात्री झोपताना पाच मिनिट तरी,आज दिवसभर ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचे आभार मानले व ज्यांनी दिवसभरात आपल्याला त्रास दिला त्यांना क्षमा केली की मनाला भरपूर शांतता लाभते व गाढ झोप लागते.आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे कारण आपण आभार मनात गेलो व कृतज्ञता व्यक्त करत गेलो की आपल्यात करुणा भाव निर्माण होतात व आपला अहंकार गळून पडतो.एकमेकांबद्दल कृतज्ञेची भावना मूळ धरू लागली की नाते संबंध दृढ होतात.अध्यात्मामध्ये असे म्हणतात की जे साधक नेहमी कृतज्ञतेच्या व समर्पणच्या भावात असतात,ते ईश्वराच्या सदैव जवळ असतात.

आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा जास्त देण्याची वृत्ती आपल्यात यायला पाहिजे.दुसर्‍यांना जास्त देण्याची वृती ही ते कृतज्ञतेच्या भावनेतून निर्माण होत असते.आयुष्यात मिळालेली प्रत्येक गोष्ट ही ईश्वराचा आशीर्वाद आहे,आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातांनाही काहीच नेऊ शकत नाही,हे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा माणसाला समाधानाची,तृप्तीचा ढेकर येतो.तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिलात,तर तुम्हाला अधिक मिळते,पण तुम्ही जर स्वत:कडे जे नाही त्याकडेच स्वत:च लक्ष केन्द्रित केलत,तर कोणतीही गोष्ट तुम्हाला कधीच पूर्णत्वाची भावना निर्माण होऊ देणार नाही.म्हणुन प्रत्येक माणसानं,आपल्याला मिळालेल्या वरदानांना आठवुन,रोज न चुकता,मनापासुन भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे आणि भगवंताचे श्रद्धापूर्वक आभार मानायला पाहिजे.आयुष्याच्या प्रवासात थांबून थांबून कृतज्ञतेच्या फुलांचा सुगंध आपण अनुभवायला पाहिजे,तेंव्हाच आपले जीवन सुखकर होत असते.तेंव्हा कृतज्ञता जरुर ठेवा.

✒️लेखक:-राजेंद्र लाड(शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)