“संत रवीदासांची विचारधारा ही केवळ भक्तीसाठी नसून स्वाभिमानी क्रांतीआंदोलनाची प्रेरणा आहे”

40

गुरू रविदास जयंती विशेष.
संपूर्ण भारतात सामाजिक क्रांतीचे प्रणेते,संतशिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी होत आहे त्या निमित्ताने अभिवादनपर हा लेख लिहीत आहे.

गुरू रविदास हे पंधराव्या शतकातील एक महान संत होऊन गेले आहेत.त्यांनी समता, न्याय,वैज्ञानिक दृष्टिकोन, रयतेचे कल्याणकरी राज्य यांचा पुरस्कार केला आहे. गुरू रविदास यांचा जन्म उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी जवळील शिरगोवर्धनपूर येथे 15 फेब्रुवारी 1398 ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनंदन तर आईचे रघुराणी होते.गुरू रविदास यांच्या पत्नीचे नाव लोणादेवी होते. बालपणापासून रविदास हे अतिशय तल्लख,चपळ होते.त्यांच्यावर संत नामदेव व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचार व कार्याचा प्रभाव होता. त्यांनी स्वतः भारतभर भ्रमण करून प्रबोधन केले.त्यांनी आपले अभंग ज्यांना साखींया म्हटले जाते,ते लिहून त्याचा प्रचार आणि प्रसार केला.संत कबीर हे गुरु रविदास यानां गुरुबंधू मानत.वाराणसी मध्ये अनेक विद्वान पंडितांना यांनी आपल्या अभ्यासाने पराभूत केले होते.त्यांच्या विषयी संत तुकाराम महाराज म्हणतात की,

‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान चंगाजी, मेरे जी के है नामदेव।
नागजन मित्र नरहरी सुनार,रविदास, कबीर सगे मेरे।।

संत कबीर, गुरुनानक यांनी रविदास यांच्या विषयी महत्त्व विशद केले आहेच.
तर संत सेना न्हावी म्हणतात,

वेद ही झुठा, शास्त्रही झुठा,भक्त कहा से पछानी।ज्या ज्या ब्रह्म तुही झुठा, झुठी साकी न मानी।
धन्य कबिरा, धन्य रविदासा गावे सेना न्हावी।

गुरू रविदास आपल्या अभंगात,

ऐसा चाहू मैं राज जहाँ,सबन को मिले अन्न ।
छोटा बडा सब सम बसे ।रविदास रहे प्रसन्न।।

गुरू रविदास यांच्या साहित्यातील 40 दोहे हे “गुरू ग्रंथसाहेब”या शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात घेतले आहेत,ज्याचे नियमितपणे गुरुद्वारामध्ये पठन होत आहे.याच बरोबर त्या काळातील अनेक राजे यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते.यात दिल्ली चा सुलतान सिकंदर शाह लोधी,चितोडची राणी झालिबाई ,
राणी संत मीराबाई सह 23राजे होते.
जागतिक विद्वान विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी15फेब्रुवारी1953ला दिल्ली येथे गुरू रविदास यांची 555वी सार्वजनिक जयंती साजरी केली आहे. तसेच त्यांनी आपला ” द अनचेबल”हा ग्रंथ गुरु रविदास यांना अर्पण केला आहे. रविदास यांचे मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी या भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा, जातिभेद यावर प्रहार केला.

ते तीर्थक्षेत्र, चारधामयात्रा यावर दोह्यात म्हणतात,

“मन चंगा,तो कठोती मै गंगा”।

सर्व मानव ही एकच आहेत,त्यांच्यात उच्च-नीच ,वर्णभेद यावर
विज्ञानवादी संदेश देत ते म्हणतात,

हम भी चामके तुम भी चामके। चाम का है जग सारा
चाम बिन कोन बना ।
पुछे रविदास संसारा।।

तसेच वेदावर प्रहार करतांना रविदास म्हणतात,

चारीव वेद करे,खन्डोती।
जन रवीदास करे ,दंडोती।।

जातीव्यवस्था यावर आघात करतांना,

” जात पात के फेर मे,उलझ रहे सब लोग।मनुष्यता को खा रहा है,रैदास जात का रोग।”
किंवा
“जात जात मे जात है,ज्यो केले के पात।

रविदास, माणूस न जुडे संके , जब तक जात न जात।”

गुरू रविदास यांचे क्रांतीकारक ,परिवर्तनवादी कार्य मान्यवर आधुनिक काळात कांशीराम यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. ते स्वाभिमानी आंदोलन आपण पुढे नेले पाहिजे.स्वाभिमान कधीही विकू नये,याबाबत गुरू रविदास म्हणतात,

“पराधीन को दीन क्या ,
पराधीन बेदीन।

रविदास, ‘दास ‘पराधीन कौ ,सब ही समझें हीन।”

गुरू रविदास महाराष्ट्र मध्ये वेरुळ लेणी येथे आले होते,त्या ठीकाणी त्यांनी प्रवचन ही दिले आहे.आज भारतात अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे आहेत.वाराणसी ,पंजाब,कात्रज- पुणे येथे त्यांचे मोठे स्मारक उभारले आहेत.तसेच त्यांच्या नावे पंजाब ,उत्तरप्रदेशात विद्यापीठात गुरू रविदास अध्यासने निर्माण केली आहेत.गुरू रविदास यांना 120वर्षे आयुष्य लाभले.अशा या महान क्रांतिकारक गुरू रविदास यांचा मृत्यू 10ऑक्टोबर1518ला राजस्थान जवळ चितोड येथे झाला आहे.आजही संपूर्ण भारतात त्यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.त्यांच्या जयंती निमित्त सर्व भारतीय यांना लाख लाख शुभेच्छा..

✒️लेखक-रामेश्वर तिरमुखे(जालना)मो:-9420705653