शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पहिली ते दहावी शिक्षकांची दर वर्षी परिक्षा घेणार: सुनिल केंद्रेकर साहेबांच्या निर्णयाचे हार्दिक स्वागत-शेख अख्तर हमीद

38

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.12डिसेंबर):- सातत्याने ढासळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाला कंटाळून मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक अफलातून निर्णय घेतला आहे. इतके दिवस जे शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेत होते, आता त्यांना स्वतः परीक्षा द्यावी लागणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत प्रशासनाकडून वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे केंद्रेकर म्हणाले. त्यामुळे आता शिक्षकांनासुद्धा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

याबाबतची अधिक माहिती देताना केंद्रेकर म्हणाले, ‘कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर आम्ही तपासाला असता, तो खूप प्रमाणात खालावला असल्याचे समोर आले. कोरोनात शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षणाचा विशेष काही परिणाम झालाय, असे दिसत नाही. जेव्हा शाळेत सर्वेक्षण केले त्यावेळी अनेक शिक्षक त्यांच्याच विषयात पारंगतच नसल्याचे समोर आले. असे फार कमी शिक्षक होते जे त्यांच्या विषयात पारंगत होते. त्यामुळे शिक्षकांचीदेखील परीक्षा घेतली पाहिजे, असा निर्णय घेतला आहे.’

केंद्रेकर सांगतात, ‘सुरुवातीला आम्ही पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणसंस्था आणि त्यातील शिक्षकांचीदेखील परीक्षा घेतली जाईल. या परीक्षांचा स्तर कठीण असणार आहे आणि सर्व शाळेत अशा परीक्षा घेतल्या जातील. शिवाय, या परीक्षेत निगेटिव्ह मार्क असतील. ही एक बहुपर्यायी परीक्षा असेल. मुख्य करून विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षेवर अधिक भर दिला जाईल. जरी ही परीक्षा बंधनकारक नसली तरी सर्व शिक्षकांनी या परीक्षा दिल्या पाहिजेत, असा माझा आग्रह आहे.’

केंद्रेकर यांच्या या निर्णयावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.शिक्षक असो किंवा समाजातील कोणताही घटक असो, त्यांनी अद्ययावत राहणे गरजेचे आहे.परंतु शिक्षणाचा दर्जा खालावयाला फक्त शिक्षक मुख्य कारण आहेत असे म्हणणे योग्य नाही.ऑनलाइन शिक्षण पद्धती आल्यापासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे मुलांचे वाचन कमी झाले आहे,’अशी अनेक कारणे असली तरीही आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे महाराष्ट्र NGO फेडरेशनचे सदस्य शेख अख्तर हमीद यांनी सांगितले आहे