बारावी परीक्षार्थांच्या हितासाठी भोंग्याचा आवाज बंद करून महाराजांनी केले कीर्तन

33

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21फेब्रुवारी):-संत निळोबाराय यांच्या पुण्यतिथी निमित्त हनुमान मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनातील भोंग्याचा आवाज कमी केल्यास बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यास अडचण होणार नाही अशी विनंती सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केल्यानंतर वारकरी संप्रदायाचे वैभव ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी येथील महात्मा फुले कॉलेजमधील परीक्षा केंद्राकडे आवाज जात असलेला भोंगा बंद करण्याची सूचना साऊंड सिस्टिम चालकास करत मनाचा मोठेपणा दाखवला. हा प्रकार मंगळवारी कोद्री येथे दुपारी 12 वाजता घडला. बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा पहिला पेपर होता.

आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर हे नियोजित भेटीगाठी दरम्यान कोद्रि येथे गेले असता तेथे त्यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली. परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात आलेल्या पालकांनी मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनातील भोंग्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. या भोंग्याचा आवाज कमी झाला तर बर होईल अशी कल्पना मांडली .यावरून सखाराम बोबडे पडेगावकर ,पत्रकार बाळासाहेब जंगले यांनी बाजूच्या मंदिरात जाऊन एक चिठ्ठी लिहीत महाराजांना या भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली.

कीर्तनाच्या नियमाप्रमाणे महाराजांचे दर्शन घेऊन महाराजांकडे चिठ्ठी दिल्याने महाराजांनी या विषयाकडे गांभीर्याने घेत चालू कीर्तनातच साऊंड सिस्टिम चालकाला परीक्षा केंद्राकडे जाणारा भोंगा बंद करण्याची सूचना केली. एकूणच परीक्षा हॉल कडे जाणारा आवाज कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुरळीतपणे परीक्षेचा पेपर लिहिता आला. ह भ प अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून घेतलेल्या निर्णयाने पालकांनी समाधान व्यक्त केले. सखाराम बोबडे पडेगावकर, बाळासाहेब जंगले यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचेही कौतुक केले.