बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; पोलिसांनी खोदकामातून मृतदेह काढला बाहेर

205

✒️सिध्दार्थ दिवेकर(यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड (दि. ६ मार्च) तालुक्यातील टेंभुरदरा येथील विद्यार्थिनीने बारावीचा पेपर खराब गेल्याच्या कारणातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती.त्यानंतर नातेवाईकांनी मृतक विद्यार्थिनीचा अंत्यविधी केला. मात्र बिटरगाव पोलिसांनी रविवारी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभूरदरा येथील विद्यार्थिनी यावर्षी बारावीला होती. तिने बारावीचे बोर्डाचे पेपरही दिले.२९ फेब्रुवारीला दिलेला पेपर खराब गेला होता.याची खंत तिने आईजवळ बोलून दाखविली होती. त्यातूनच ती तणावात होती.

अशी माहिती आता समोर येत आहे. याच कारणातून शनिवारी विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन केले.ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तिला ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने उमरखेड येथे रेफर करण्यात आले.

मात्र विडूळजवळच विद्यार्थिनीची प्राणज्योत मावळली. त्यानंतर नातेवाईकांनी विद्यार्थिनीचा मृतदेह घेऊन टेंभूरदरा येथे आणला. यावेळी अंत्यसंस्कारही उरकविले.

दरम्यान याची कुणकुण बिटरगाव पोलिसांना रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह बाहेर काढणार असल्याचे सांगितले.तसेच गस्तीवर पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले. त्यानुसार तहसीलदार यांची परवानगी घेऊन रविवारी दुपारी १२ वाजता खोदकाम करून मृतदेह बाहेर काढण्यात आला.शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार पवार, डॉ. स्वाती मुनेश्वर, ठाणेदार प्रेम केदार, पोलीस कर्मचारी निलेश भालेराव, प्रकाश मुंडे, प्रवीण जाधव, बिट जमादार विद्या राठोड, उद्धव घुगे आदी उपस्थित होते.